मुंबईत धक्कादायक घटना! होळी साजरी करायला गेलेले ५ तरुण समुद्रात बुडाले
मुंबईतील माहिम समुद्र किनाऱ्यावर मोठी दुर्घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. होळी साजरी करायला गेलेले ५ तरुण समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गंभीर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर या पथकाने समुद्रात बुडालेल्या ५ तरुणांपेैकी ४ जणांना बाहेर काढले. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. तर एकाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या घटनेबाबत पोलीस निरीक्षक बिलाल शेख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दुपारी तीन वाजताच्या सुमारास संपूर्ण किनारा रिकामा केला होता. त्यानंतर काही तरुण पुन्हा इथे आले आणि त्यांनी होळी साजरी करायला सुरुवात केली. त्यानंतर हा दुर्दैवी प्रकार घडला. दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तर दोघांना रेस्क्यू ऑपरेशन करुन बाहेर काढण्यात आलं. दोघांना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. परंतु, एकाचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती अजूनही गंभीर आहे. कोणताही सण साजरा करताना अतिउत्साहाने करु नये, असं तरुणांना आमचं आवाहन आहे.