Thane Kalwa Rain : कळवा पूर्व भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, चिमुकल्यांना चक्क बोटीने बाहेर काढलं

Thane Kalwa Rain : कळवा पूर्व भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, चिमुकल्यांना चक्क बोटीने बाहेर काढलं

ठाणे जिल्ह्यात दिवसभर अधूनमधून जोरदार पाऊस कोसळत राहिल्याने ठाणे शहरासह कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा आदी भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले.
Published by :
Team Lokshahi
Published on

ठाणे जिल्ह्यात सोमवारी (18 ऑगस्ट) मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. दिवसभर अधूनमधून जोरदार पाऊस कोसळत राहिल्याने ठाणे शहरासह कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा आदी भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले. विशेषतः कळवा पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने शाळकरी मुलांना चक्क बोटीच्या सहाय्याने घरी पोहोचवण्याची वेळ आली.

दुपारच्या सुमारास पावसाचा जोर वाढत गेला. सुरक्षिततेच्या कारणास्तव शाळांना तातडीने सुट्टी जाहीर करण्यात आली. मात्र, सर्व रस्ते पाण्याखाली गेल्याने कोणतेही वाहन वाहतूक करू शकत नव्हते. परिणामी, अडकलेल्या लहान मुलांना पालकांनी व स्थानिकांच्या मदतीने बोटीतून बाहेर काढत घरी नेले. या दृश्यामुळे पावसाचे भीषण चित्र स्पष्ट झाले.

राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने कहर माजवला असून, मराठवाड्यानंतर आता मुंबई, ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जाहीर केला असून, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

कळवा पूर्वेतील शाळेत घडलेली ही घटना ठाणेकरांसाठी धक्कादायक ठरली. पालकांना आपल्या मुलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली असून, नागरिकांनी प्रशासनाकडे प्रभावी पावसाळी व्यवस्थापनाची मागणी केली आहे.

दरम्यान, वंदना बस डेपो परिसरासह ठाण्यातील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. ठाणे महापालिकेने पाणी उपसा करण्यासाठी पंप लावले असले तरी नागरिकांची प्रचंड गैरसोय सुरूच आहे. वाहतूक कोंडी, घरात पाणी शिरणे आणि वीजपुरवठा खंडित होणे यामुळे ठाणेकरांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com