पंकजा मुंडे यांनी लिहिलं मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना पत्र
पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पत्र लिहिलं आहे. या पत्रात पंकजा मुंडे म्हणाल्या की, ओबीसी आरक्षणा संदर्भात प्रा. लक्ष्मण हाके व त्यांचे सहकारी वडीगोद्री जि. जालना येथे गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषणास बसले आहेत, त्यांच्या पोटात अन्नाचा कणही नाही पाणी देखील बंद केले आहे. शासनाची भूमिका ही सर्व आंदोलनांना सारखीच असली पाहिजे.
श्री हाके यांच्याबाबत प्रमुख मंत्र्यानी तसेच आपण स्वतः गांभिर्याने लक्ष तर द्यावेच याशिवाय उपोषणास भेट देऊन सन्मान द्यावा, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं. ते अत्यंत संयमाने आणि सर्वांना सन्मानाने वागवत आहेत हे कौतुकास्पद आहे. त्यांचं आणि सर्व ओबीसी नेत्यांचं आवाहन देखील सकारात्मकच आहे. "कोणीही कुठल्याही प्रकारे नकारात्मक गोष्टी करू नयेत, कुठल्याही प्रकारची हिंसा करू नये" असंच आवाहन ते करत आहेत म्हणजे व्यवस्थेचा सन्मानच करत आहेत.
यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की, म्हणूनच त्यांच्याकडे तात्काळ लक्ष देणं तेवढंच महत्वाचं आहे. इथे प्रश्न समान न्यायाचा आहे, म्हणणे ऐकून कायद्याने निर्णय घ्यावा अशी आवश्यकता आहे. आपण व दोन्ही उप मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या वतीने या आंदोलना विषयीची आपली भूमिका जाहीर स्पष्ट करावी व तिथे भेट द्यावी अशी आपणास माझी विनंती आहे. असे पंकजा मुंडे म्हणाल्या.