लम्पीचा प्रसार रोखण्यासाठी जनावरांच्या लसीकरणाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
देशभरात सध्या लम्पी आजाराने थैमान घातल्याचं पाहायला मिळतंय. अनेक जनावरे या रोगाने दगावताय. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची काळजी घेणं महत्वाचं आहे. हा रोग संसर्गजन्य असल्याने एका जनावराकडून दुसऱ्या जनावराला याची लागण होतेय. राज्यात लम्पीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारही आता अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय कारण, लम्पीमुळे उत्त्तरेकडील राज्यांमध्ये हजारो जनावरांचा मृत्यू झालाय त्यामुळे पशुपालकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. महाराष्ट्रावरही हे संकट दूर नाहीये राज्याच्या अनेक भागात जनावरांना या आजाराची लागण झालीय.
या पार्श्वभूमीवर लम्पीच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी लसीकरण गरजेचं असल्याचं तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे आता लसीकरणाबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जनावरांच्या लसीकरणासाठी 50 लाख लसींची ऑर्डर देण्यात आली आहे. सोमवार-मंगळवारपर्यंत राज्यात 50 लाख लस उपलब्ध होणार आहेत. या लसींचं जिल्हानिहाय वाटप केलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
1929ला दक्षिण आफ्रिकेत या रोगाचा शोध लागला अर्थातच प्रथमतः आढळून आला. 2012-13 नंतर लम्पी रोग भारतात आढळला. भारतात राजस्थान, पंजाब, गुजराज, हरियाणा, हिमाचल प्रदेशात हा आजार आढळला. आता महाराष्ट्रातही याचा प्रादुर्भाव झालाय. हा आजार फक्त जनावरांमध्ये आढळतो. बाधित जनावरांच्या संपर्कात आलं तरी मनुष्याला या आजाराची लागण होत नाही. त्यामुळे बाधित जनावरांवर उपचार करताना घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही.
लम्पी आजाराची लक्षणे कोणती?
जनावराला ताप येतो.
जनावरे चारा-पाणी कमी करतात.
एक-दोन दिवसात अंगावर गाठी येतात.
या गाठी संपूर्ण शरीरावर पसरतात.
जनावरांच्या पायाला सूज येते.
परिणामी जनावरे दगावतात.
वेळेत उपचार केल्यास आजाराचा धोका कमी.