उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये सत्संगाच्या वेळी चेंगराचेंगरी; 100 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. रतिभानपूर येथे सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी झाली आहे. यामुळे अनेक लोक जखमी झाले आहेत. त्यापैकी बहुतांश महिला आणि लहान मुले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी एटा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या अपघातात गुदमरून अनेकांचा मृत्यू झाला असावा, अशी भीतीही व्यक्त होत आहे. या ठिकाणी भोले बाबांचा सत्संग सुरू होता, असे सांगण्यात येत आहे. त्यानंतर समारोपाच्या वेळी चेंगराचेंगरी झाली. जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा प्रशासनाचे अनेक अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
हाथरस येथील फुलराई गावात ही घटना घडली. कार्यक्रमाच्या आयोजकांनी परवानगी घेतली होती, मात्र आयोजकांनी प्रशासनाला सांगितलेल्या संख्येपेक्षा जास्त लोक आले होते. ही घटना एका धार्मिक सत्संगादरम्यान घडली, ज्यामुळे गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी होऊन अनेक भाविकांचा मृत्यू झाला, तर काही जण जखमीही झाले आहेत. शवविच्छेदन तपासणी आणि पुढील कार्यवाहीसाठी मृतांचे मृतदेह एटा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले आहेत.