Chhatrapati Sambhaji Nagar : लग्न समारंभात अचानक आलं वादळ, अन् पुढे जे झालं ते...

Chhatrapati Sambhaji Nagar : लग्न समारंभात अचानक आलं वादळ, अन् पुढे जे झालं ते...

लग्न समारंभातील वादळ: संभाजीनगरमध्ये अचानक आलेल्या वादळाने लग्न समारंभातील मंडप उडाला, अफरातफरीचे वातावरण निर्माण.
Published by :
Rashmi Mane
Published on

छत्रपती संभाजीनगर शहरातील मोतीवाला कॉलनीत सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या एका भव्य लग्न समारंभावर अचानक आलेल्या वादळाने मोठे संकट ओढवले. संध्याकाळच्या सुमारास आकाशात काळे ढग दाटून आले आणि काही क्षणांतच जोरदार वाऱ्याचा झटका बसला. या वादळामुळे समारंभासाठी उभारलेला भव्य मंडप काही सेकंदांतच उडून गेला.

घटनेच्या वेळी मंडपाखाली सुमारे 300 ते 400 लोकांची उपस्थिती होती. वऱ्हाडी मंडळी, वधू-वर पक्ष आणि इतर सर्वजण आनंदाच्या भरात असतानाच वाऱ्याने मंडप उचलून नेल्याने काही क्षणासाठी अफरातफरीचे वातावरण निर्माण झाले. लोकांनी धावत-पळत सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मंडपाचा संपूर्ण ढाचा आणि जवळ उभ्या असलेल्या काही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

घटनास्थळी उभ्या असलेल्या अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांवर मंडपाच्या लोखंडी पट्ट्या व कापडाचे तुकडे आदळल्याने त्यांचेही नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिक आणि समारंभाचे आयोजकांनी प्रसंगावधान राखत मदतकार्य सुरू केले आणि लहान मुलांना, महिलांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवले. या धक्कादायक घटनेचा संपूर्ण प्रकार जवळील इमारतींवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सदरचे व्हिडीओ फुटेज सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, मंडप उडतानाचे थरारक दृश्य पाहून अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

हवामान खात्याने आधीच शहरात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला होता. मात्र, समारंभ आयोजकांकडून याचा गांभीर्याने विचार झाला नसल्याचे बोलले जात आहे. यामुळेच अचानक आलेल्या वादळाने इतक्या मोठ्या प्रमाणावर नुकसान घडवले. यापुढील काळात अशा समारंभांसाठी उभारल्या जाणाऱ्या मंडपांच्या मजबुतीची खातरजमा करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com