नाथषष्ठी यात्रा उत्सव काळात होणार 70 कोटींची उलाढाल
सुरेश वायभट | पैठण: नाथषष्ठीनिमित्त लाखो भाविक नाथनगरीत दाखल झाले असुन बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले असुन जवळपास ७० कोटींची उलाढाल होणार आसल्याची माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पवन लोहिया यांनी दिली.
पैठण शहरातील नाथषष्ठी यात्रा गुढीपाडव्यापर्यंत चालते. यात्रेत गळ्यातील तुळशीमाळेपासुन सर्वकाही मिळते. ज्या वस्तू शहरी बाजारपेठेत मिळत नाहीत अशी घोंगडी, बेलने, पोळपाट, मृदंग, पेटी, तबला, काठवत, भांडे, निरंजन, समई, टाळ, अशा अनेक वस्तूंची दुकाने यात्रेत 15 दिवस व्यवसाय करतात.
नाथषष्ठी यात्रेत व्यवसाय करण्यासाठी महाराष्ट्रभरातून व्यापारी येतातच. शिवाय गुजरात, मध्यप्रदेश आदी राज्यांतील व्यापारीही हजेरी लावतात. नाथषष्ठीसाठी पैठण शहरातील व्यापारी महिनाभरापासून तयारी करतात. शहरातील वारकऱ्यांची संख्या लक्षात घेता किराणा माल व कापड मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्यांनी भरून ठेवला आहे. वर्षभरात जेवढा किराणा माल विकला जातो. तेवढाच माल षष्ठी कालावधीत विकला जातो. यामुळे शहरातील व्यापाऱ्यांच्या दृष्टीने नाथषष्ठी यात्रेचे मोठे महत्त्व आसल्याचे लोहिया सांगतात.