बुलढाण्यात आदित्य ठाकरेंची तोफ धडाडली, म्हणाले, "भाजपचे लोक शेतकऱ्यांवर..."
लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचे उमेदवार विजयी व्हावे, यासाठी सर्वच नेतेमंडळींनी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यास सुरुवात केलीय. काही मतदारसंघात प्रचार मोहिमही राबवण्यास सुरुवात झालीय. बुलढाण्यात ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. केंद्र सरकारमधील भाजपचे लोक शेतकऱ्यांना मावोवादी बोलतात. भाजप शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. ड्रोनच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर अश्रुधुर सोडला. माझ्या देशातील शेतकरी दहशतवादी आहे का? असा सवाल करत आदित्य ठाकरे यांनी मोदी सरकारवर तोफ डागली आहे.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, दहा वर्ष सामान्य नागरिकांचे सरकार येईल, असं वाटलं होतं. पण आता भयानक रुप दिसत आहे. दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींनी जे वचन दिलं होतं, ते पूर्ण केलं नाही. शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला गेला. उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना कर्जमुक्ती झाली होती. आपल्याला जनतेचं पोट भरायचं आहे.
देशात महाविकास आघाडीचं सरकार येईल. देशभरात परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. आम्हाला आता भाजप सरकार नको आहे. कापसाला भाव नाही. सोयाबीनला भाव नाही. महाराष्ट्रात एकतरी नवीन उद्योग आला का? सर्व उद्योग गुजरातला पाठवले आहेत. आता आपल्या हक्काचं सरकार आणलच पाहिजे, असा ठाम निर्धार करत आदित्य ठाकरेंनी भाजपवर टीका केली.