राजकीय भूकंपानंतर आदित्य ठाकरेंचा शिंदे - फडणवीस सरकारवर हल्लाबोल
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. यावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हटले की, आजच्या राजकारणातल्या गलिच्छ परिस्थितीवर भाष्य न करता काही महत्वाचे प्रश्न असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलं आहे.
आदित्य ठाकरेंचे ट्विट जशाच तसे
मंत्रिमंडळ विस्तार झाला. आधीच फेल झालेल्या डबल इंजिनाला अजून एक चाक लागलं. चला, पण ज्या गद्दारांना मंत्रीपदाची स्वप्नं पडत होती, त्यांना १ वर्ष उलटल्यावरही काय मिळालं??
रायगड असो, नाशिक असो, जळगाव असो... जे गद्दार स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्रास होतोय असं सांगत होते, आता राष्ट्रवादीच्या त्याच नेत्यांना मंत्रीपदं मिळाल्यावर ह्यांचं काय होणार? आता पुन्हा गुवाहाटी??
एक गद्दार आज टीव्हीवर म्हणाले, “१४५ जागा जिंकायच्या असतील तर ह्यांना सोबत घ्या”, असं वरिष्ठांनी सांगितलं. म्हणजे हे सिद्ध झालंय की मिंधेंकडे क्षमताच नाही!
नाहीतर एवढं गद्दारांचं बहुमत असताना आजचा कार्यक्रम कशाला??
आणि सर्वात महत्वाचं... आम्ही कॉंग्रेस आणि NCP सोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं, असं म्हटलं गेलं.
मग आज भाजपाने काय केलं??
तेही सत्तेसाठी आकड्यांची गरज नसताना!
एक सिद्ध झालं, तुमच्या गद्दारीमागे फक्त आणि फक्त स्वार्थ आहे!
'स्वार्थी विरुद्ध स्वाभिमानी', अशी ही लढाई असणार आहे!