'बेस्ट'ची दुप्पट दरवाढ, आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
बेस्टचा प्रवास महागला असून आता पास देखील महागणार असल्याची माहिती मिळत आहे. बेस्ट बसच्या तिकीटदरात वाढ करण्यास मान्यता मिळाली आहे. बेस्ट उपक्रमाला आर्थिक टंचाईतून बाहेर काढण्यासाठी बेस्ट बसच्या तिकीट दरात वाढ करण्याच्या निर्णयाला मुंबई महापालिकेने मंजुरी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. वाढीव तिकीट दरवाढीची अंमलबजावणी तात्काळ केली जाणार आहे. बेस्ट बसच्या तिकीट दरवाढीला मुंबई महापालिकेने मंजुरी दिली असून आता साध्या बसचा किमान तिकीट दर पाच रुपयांऐवजी दहा रुपये होणार आहे. यासोबतच वातानुकूलित बसचा किमान दर सहा रुपयांवरुन बारा रुपये होणार आहे. तर मासिक पासात तब्बल 350 रुपयांची वाढ होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आता आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, 'मुंबईतील सामान्य माणसाची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बससेवेकडे सत्ताधाऱ्यांकडून गेल्या २-३ वर्षांत मुद्दाम दुर्लक्ष केलं जातंय. आता तर बेस्टची दुप्पट दरवाढ करण्याची बातमी आलीये. सामान्य मुंबईकरांचं रोजचं जगणंच कठीण व्हावं असाच सत्ताधाऱ्यांचा विचार दिसतोय.
'जगातील सर्वात स्वस्त शहरी बससेवा अशी ओळख असलेल्या आणि लाखो मुंबईकरांना सेवा देणाऱ्या बेस्टचं हे अधःपतन आम्ही सहन करु शकत नाही. बेस्ट दुप्पट दरवाढीला आमचा विरोध आहे! बेस्ट बसेसची संख्या आधीच रोडावलीये, महत्वाचे मार्ग बंद केलेत, आता जर दरवाढही केली तर बेस्टवर त्याचा विपरीत परिणाम होईल. आमची ठाम मागणी आहे, इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढवा, बेस्टचा दर्जा सुधारा आणि मुंबईकरांना चांगली सेवा द्या! बेस्ट वाचवा!' असे आदित्य ठाकरे म्हणाले.