Aaditya Thackeray : मुंबईत पाणी टँकर असोसिएशनचा संप; आदित्य ठाकरे म्हणाले...
मुंबईत आजपासून टँकर असोसिएशनकडून संप पुकारण्यात आला आहे. उन्हाळा सुरु झाला असून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये केवळ 33 टक्के पाणीसाठा शिल्लक असतानाच आता टँकर असोसिएशनकडून संप पुकारण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या नव्या नियमांना विरोध करण्यासाठी मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने संप पुकारला आहे. या संपामुळे आता हॉटेल्स, गृहप्रकल्प, विकासकामे, रुग्णालय या ठिकाणी पाणीपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे.
याच पार्श्वभूमीवर आता आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबई टँकर असोसिएशनने आज संपाची हाक दिली असून, पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता ह्या दिवसांत अनेक गृहनिर्माण सोसायट्या, उंच इमारती, चाळी, व्यावसायिक कार्यालये आणि उद्योगांना ह्याचा फटका बसणार आहे.
भारत सरकारच्या केंद्रीय भूजल प्राधिकरणाने बल्क वॉटर सप्लायर्ससाठी ज्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत, त्यातील अडचणी सोडवल्या जाव्या, ह्या मागणीसाठी असोसिएशन आंदोलन करत आहे. गेल्या तीन वर्षांपासून हा मुद्दा प्रलंबित असून, महाराष्ट्र सरकारने तो अजूनही केंद्र सरकारकडे गांभीर्याने मांडलेला नाही.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, आज दिल्लीतील सरकारी कार्यालयांत बसून बनवलेल्या काही अव्यवहार्य मार्गदर्शक तत्त्वांमुळे मुंबईकरांना त्याची किंमत मोजावी लागणार आहे. मी बीएमसी आयुक्तांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईकरांना 'ह्या पाणीबाणीवर महापालिकेकडे काय उपाययोजना आहे', हे स्पष्टपणे सांगावे. तसेच, एसंशि सरकारने आमच्या कार्यकाळात नियोजित केलेला खारपाणी गाळण प्रकल्प (डिसॅलिनेशन प्लांट) रद्द केला नसता, तर २०२६ पर्यंत मुंबईचे पाणी संकट संपले असते. असे आदित्य ठाकरे म्हणाले.