Aaditya Thackeray : देशभरात स्पर्धा परिक्षांमध्ये सुरु असलेले घोळ दिवसेंदिवस वाढतच चाललेत
नीट परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या आरोपावरून राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, देशभरात स्पर्धा परिक्षांमध्ये सुरु असलेले घोळ दिवसेंदिवस वाढतच चाललेत. पेपरफुटीच्या घटना सातत्याने घडत आहेत. NEET च्या निकालांमधला नवीन घोळ समोर आलाच आहे. आत्तापर्यंत अनेक तरुण विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षांच्या तणावाला बळी पडून आत्महत्या केल्या आहेत. हे भयंकर आहे.
देशासमोर उभा असलेला बेरोजगारीचा गंभीर प्रश्न आणि परिक्षांमधला भ्रष्टाचार ह्याचा फटका सामान्य घरातल्या मेहनती मुलांना बसतोय. भविष्य घडवण्यासाठी ही मुलं जीवापाड मेहनत करत असतात, अभ्यास करत असतात, पण अनेकदा त्यांच्या नशीबी निराशाच येते.
ना नोकऱ्या मिळतात, ना उच्च शिक्षणाच्या संधी. हे चित्र तातडीने बदलायला हवं. सगळ्यात तरुण देश असलेल्या आपल्या भारतातल्या तरुणांना न्याय मिळायला हवा! केंद्रात येऊ घातलेल्या नव्या सरकारने ह्याकडे तातडीने लक्ष द्यावं. असं आदित्य ठाकरे म्हणाले.