ओव्हरलोड वाहतुकीवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन छेडू, गावराई ग्रामस्थांची मागणी
Team Lokshahi

ओव्हरलोड वाहतुकीवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन छेडू, गावराई ग्रामस्थांची मागणी

गावराई ग्रामस्थांचा जिल्हा प्रशासनाला इशारा
Published by :
shweta walge

प्रसाद पाताडे | सिंधुदुर्ग: मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून नव्याने करण्यात आलेल्या गावराई येथील रस्त्याची ओव्हरलोड चिरे वाहतुकीमुळे दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून भरधाव चालणाऱ्या वाहतुकीमुळे शालेय मुले व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून होणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीवर प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा गावराई ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना तसेच कुडाळ तहसीलदार याना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

कुडाळ तालुक्यातील गावराई धनगरवाडी सडा या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून गेली चार वर्षे रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यात गरज नसताना खोदकाम केले जात असून ही माती शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नसतानाही या रस्त्यावरून हेदुळ गावातील चिरे खाणीतून उत्खनन होणाऱ्या चिऱ्यांची वाहतूक करणारे डंपर सुसाट वेगाने जात आहेत. नव्याने होत असलेल्या रस्त्यावरून ओव्हरलोड वाहतूक होत असल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे. तसेच या रस्त्यावरून शाळकरी मुले आणि ग्रामस्थांची ये जा सुरू असते. मात्र या रस्त्यावरून ओव्हरलोड वाहतूक होत असल्याने शाळकरी मुले व ग्रामस्थांच्या जीवितास धोकादायक ठरत आहे. दोन दिवसापूर्वीच या रस्त्यावर चिरे वाहतूक करणाऱ्या डंपर ब्रेक फेल होऊन रस्त्याच्या कडेला कलंडला होता. यावेळी समोरून येणारा दुचाकीस्वार थोडक्यात वाचला होता. यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या प्रकाराबाबत संतापही व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आज गावराई ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांची व् कुडाळ तहसीलदार यांची भेट घेत निवेदन सादर केले. तसेच या रस्त्यावरून अवजड वाहनांना बंदी घालावी, चिरे वाहतूक बंद करावी अशी मागणी केली आहे. तसे न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील दिला आहे. यावेळी गावराई सरपंच उदय नारळीकर, पोलीस पाटील स्वप्नील वेंगुर्लेकर, गितेश राऊत, अमित राणे, निलेश आंगणे, गोविंद फाले, आदीसह मोठ्या संखेने ग्रामस्त उपस्थित होते.

पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले

गावराई येथे सुरू असलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्याचे होत असलेले नित्कृष्ट काम आणि या रस्त्यावरून होत असलेली ओव्हरलोड चिरे वाहतूक याकडे संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे गावराई सरपंच नारळीकर यांनी लक्ष वेधले आहेत. तर याबाबत गंभीर दखल घ्यावी अशी मागणी केली आहे.

ओव्हरलोड वाहतुकीवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन छेडू, गावराई ग्रामस्थांची मागणी
अफजल खानाच्या कबरीवरील बांधकामाचा चबुतरा जमीनदोस्त केल्यानंतर अशी दिसते ही कबर! पाहा EXCLUSIVE फोटोज
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com