Nagpur School Vans : नागपूरमध्ये अवैध विद्यार्थी वाहतूकप्रकरणी 161 स्कूल व्हॅन्सवर कारवाई
जूनच्या मध्यावरच देशातील जवळजवळ सर्वच शहरातील शाळा सुरु झाल्या आहेत. बरेच विद्यार्थी हे ऑटो, बस किंवा स्कूल व्हॅनने प्रवास करतात. मात्र विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या स्कूल व्हॅन आणि रिक्षावाल्यांना सरकारने काही नियम आखून दिलेले आहेत. त्या नियमांचे उल्लंघन करून हजारो विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ करून स्कूल बस, रिक्षावाले प्रवास करत असतात. याच पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये नियम धाब्यावर बसवून गाडी चालवणाऱ्या स्कूल व्हॅन, बस आणि रिक्षावाल्यांवर नागपूरच्या वाहतूक पोलीस विभागाने कारवाई केली आहे.
स्कूल बस, रिक्षांसह लहान व्हॅनमधून विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचविण्याचे प्रमाण अलिकडे वाढले आहे. अनेक स्कूल व्हॅन्समध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलांना बसवून वाहतूक केली जात असे. रिक्षा, व्हॅन, बसमध्ये क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त विद्यार्थ्यांना कोंबून त्यांची ने-आण केली जाते. मुख्य म्हणजे अशी वाहतूक करणाऱ्यांकडून अनेकदा सुरक्षिततेविषयक खबरदारी घेतली जात नाही. त्यामुळेच अनेकदा अपघात घडण्याची शक्यता असते. शहरात विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करण्यासाठी शालेय बस आणि स्थानिक रिक्षांचा वापर केला जातो. मात्र, या वाहनांकडून सर्व नियम धाब्यावर बसवले जातात. बऱ्याच वेळेला वाहनांचा वेग जास्त असतो. अशा वाहनाचालकांचे वाहनांवरील नियंत्रण सुटून अपघात होण्याची शक्यता वाढते.
काही रिक्षा, व्हॅनचालक प्रमाणापेक्षा जास्त विद्यार्थ्यांची ने-आण करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना इजा होण्याची शक्यता असते. काही वेळेला वाहनचालकाकडून सिग्नल तोडले जातात आणि जोरात गाडी पळवली जाते. अशा प्रकारे बेकायदेशीर वाहतूक करणे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक आहे. याच आधारावर नागपूरमध्ये स्कूल व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी भरून वाहतूक केल्याप्रकरणी तसेच सिग्नल तोडल्याप्रकरणी आणि वैध लायसन्स नसल्यामुळे अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. सुमारे १६१ स्कूल व्हॅन्सवर ही दंडात्मक कारवाई केली गेली आहे. नियमांचे उल्लंघन करून विद्यार्थ्यांची वाहतूक करणे धोकादायक असल्याने प्रशासनाने ही कारवाई केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांना शासनाकडून नियम ठरवून दिलेले असतानाही त्यांच्याकडून या नियमावलीकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. मात्र स्कूल व्हॅन चालकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षितरित्या होईल.