AI : राज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र स्थापन; Microsoft व शासनात सामंजस्य करार उपमुख्यमंत्री अजित पवार
राज्यातील प्रशासनात कार्यक्षमता, पारदर्शकता आणि डिजिटल साक्षरता वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर केला जावा. AI तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होण्यासाठी मायक्रोसॉफ्ट Microsoft आणि राज्यशासन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. याचपार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांसह महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकारातून, नोएडामधील मायक्रोसॉफ्ट सेंटर ऑफ एक्सलन्स आणि हैदराबादच्या गुगल आयटी पार्कच्या धर्तीवर आयटी पार्क किंवा इनोव्हेशन सेंटर स्थापन करण्याचा प्रयत्न असून, यासाठी नियोजन करण्यात येत आहे.
या बैठकीत शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य, नगरविकास आदी विविध क्षेत्रांत कृत्रिम बुद्धिमत्तेचे कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी कौशल्यविकास अभ्यासक्रम तयार करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. या अभ्यासक्रमांसाठी आयटीआय, पॉलिटेक्निक, पदवी व पदव्युत्तर स्तरावर वेगवेगळे अभ्यासक्रम तयार करावेत, असे निर्देश या बैठकीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले.
यासाठी उद्योग, तंत्रशिक्षण व कौशल्यविकास विभागांनी मार्गदर्शक व समन्वयक म्हणून काम करावे, असे सांगण्यात आले. विद्या प्रतिष्ठानच्या प्रस्तावित एआय सेंटर ऑफ एक्सलन्सद्वारे जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळा उभारण्याबरोबरच कृषी विज्ञान केंद्रात एआय तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याने कर्करोग उपचारासाठी 'ई-संजीवनी' तंत्रज्ञानाचा वापर राज्यातील रुग्णालयांमध्ये सुरु करण्यासंदर्भातही चर्चा झाली. राज्य शासनाच्या सर्व विभागांमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज असून, या क्षेत्रात राज्याला सहकार्य करणाऱ्या सर्व कंपन्यांचे स्वागत करण्यात येईल, असेही अजितदादा पवार यांनी सांगितले.