दुग्धविकास मंत्री विखे यांच्या आश्वासनानंतर खासदार लंके यांचे आंदोलन मागे

दुग्धविकास मंत्री विखे यांच्या आश्वासनानंतर खासदार लंके यांचे आंदोलन मागे

कांदा आणि दुधाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी खासदार निलेश लेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवसांपासून जन आक्रोश आंदोलन सुरू केले होते.
Published by :
shweta walge
Published on

कांदा आणि दुधाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी खासदार निलेश लेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवसांपासून जन आक्रोश आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन रात्री बारा वाजता मागे घेण्यात आले आहे. दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची शिष्टाई सफल झाली.

प्रशासन आणि सरकार आंदोलनाची दखल घेत नसल्यामुळे आंदोलकर्ते आक्रमक झाले होते. रात्री उशिरा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी विखे आणि जयंत पाटील यांनी शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेतली. या बैठकी नंतर विखे यांनी आंदोलन स्थळी जाऊन सरकारची भूमिका विषद केली.

यावेळी राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, कांद्याला आधारभूत किंमत ठरवण्यासाठी केंद्राकडे याबाबत पाठपुरावा करण्यात येणार आहे. सहकारीखाजगी संस्थांनी दुधाला 30 रुपये प्रति लिटर भाव द्यावा असा आदेश देण्यात आला असून राज्य सरकार पाच रुपये अनुदान देणार असल्याचे म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मध्यस्थी करत विखे यांनी आंदोलकांच्या मागण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे आता आंदोलन स्थगित करण्यात यावे अशी चर्चा खा.लंके यांच्यासोबत केल्यानंतर कांदा आणि दूध प्रश्नावर सरकारला काही वेळ हवा आहे. प्रश्न सुटला नाही तर पुन्हा आंदोलन करता येईल असेही यावेळी जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर आमची चर्चा झाली आणि या चर्चेनंतर त्यांनी 15 दिवस ते एक महिना कालावधी मागितला असल्याने तो कालावधी आम्ही सरकारला दिला आहे. मात्र सरकारने दोन्ही प्रश्न बाबत चालढकल करण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा खा. निलेश लंके यांनी दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com