Air India Flight : एअर इंडियाचे विमान मुंबई रनवेवर घसरले
एअरइंडिया कंपनीच्या मागील साडेसाती संपता संपत नाही आहे. १२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या अपघातानंतर एअरइंडिया कंपनीने लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक मोठे निर्णय घेतले. मात्र असे असले तरी काही ना काही कारणाने त्या कंपनीच्या विमानांमध्ये अडचणी येतच आहेत. आज सकाळी कोच्चीहून येणारे एक विमान मुंबईच्या रनवेवर अचानक घसरले. सुदैवाने यामध्ये कोणालाही इजा झाली नाही.
एअरइंडियाच्या कोच्चीहून येणाऱ्या विमानाला मुंबई विमानतळावर अपघात झाला. आज सकाळी ९.२७च्या सुमारास कोच्चीहून मुंबईकडे येणारे फ्लाइट क्रमांक AI2744 विमान मुंबई विमानतळावर उतरताना अचानक मुंबईच्या रनवेवर घसरले. मात्र वेळीच वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमानावर नियंत्रण मिळवले. त्यामुळे पुढील अपघात टळला. या घटनेनंतर तात्काळ मुंबईच्या रनवेवर CSMIA च्या आपत्कालीन प्रतिसाद पथकांना पाचारण करण्यात आले.
मुसळधार पावसामुळे ते विमान घसरल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेम्बर्स सुरक्षित असून त्यांना या घटनेनंतर तात्काळ विमानातून बाहेर काढण्यात आले. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने त्या विमानाची तपासणी करण्यासाठी ते विमान तपासणी विभागाकडे पाठवण्यात आले.
एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, सर्वजण सुरक्षित असून कोणताही धोका नाही. मात्र ज्या रनवेवर हे विमान घसरले त्या रनवेचे थोडेसे नुकसान झाले आहे. त्यामुळे विमानाचे कामकाज थांबू नये यासाठी पर्यायी दुसरा रनवे 14/32 चालू करण्यात आला आहे. या सर्व प्रकारामुळे विमानातील प्रवाशांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र विमानामधून बाहेर आल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.