Ajit Pawar
Ajit Pawar

पंकजा मुंडेंच्या प्रचारसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मोठं विधान; म्हणाले, "मराठवाड्याचा मागासलेपणा..."

बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या प्रचारसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं.
Published by :

Ajit Pawar On Pankaja Munde : गोपिनाथ मुंडे सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे नेते होते. मराठवाड्याचे ते दैवतच होते. सर्वात प्रथम मी त्यांना आदरांजली अर्पण करतो. पंकजा मुंडे स्वर्गीय गोपिनाथ मुंडे यांच्या संघर्षाचा आणि विचारांचा वसा घेऊन वाटचाल करत आहेत. त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद करतो. गोपिनाथ मुंडे यांनी मराठवाड्याला आपलं कुटुंब मानलं होतं. सर्व समाजाला सोबत घेऊन त्यांनी समाजकार्य आणि राजकारण केलं. मराठवाड्याचा मागासलेपणाचा शिक्का पुसून विकासाच्या प्रवाहात मराठवाड्याला आणण्यासाठी मुंडेंनी आजन्म संघर्ष केला. तोच विचार घेऊन आपण पुढे जात आहोत, असं मोठं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. ते पंकजा मुंडे यांच्या प्रचारसभेत बीडमध्ये बोलत होते.

राज ठाकरेंच्या विधानाचा दाखला देत पवार म्हणाले, अजित पवार ज्या दिवसापासून राजकारणात आले, तेव्हापासून त्यांनी जातीपातीचं राजकारण केलं नाही, असं राज ठाकरे म्हणाले. तीच माझी भूमिका आहे. शीव शाहू-फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन काम करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. ही लोकसभेची निवडणूक आहे. देशाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे. ही भावकी, गावकीची निवडणूक नाहीय. बीड लोकसभा मतदारसंघाच्या विकासाची ही निवडणूक आहे. त्यामुळे भावनिक होऊन मतदान करु नका. महायुती सरकारच्या माध्यमातून बीडच्या मागासलेपणाचा शिक्का मिटवून टाकायचा आहे. विकासकामे बोलून होत नाहीत. त्यासाठी नवनवीन योजना आपल्याला हाती घ्याव्या लागतात.

शेतकऱ्यांना पिण्याचं पाणी आणि शेतीला पाणी मिळालं पाहिजे. यापूर्वी विरोधी पक्षाचा आमदार आणि खासदार म्हणून निवडून यायचे आणि लोकसभेत मोदींच्या विरोधात भाषणे करायचे. पण आपल्याला निधी आणण्यासाठी एक दोन पावले पुढे मागे टाकावी लागतात. तेव्हा कुठेतरी निधी मिळतो. या गोष्टींच भानही काही लोकांना नव्हतं. मराठवाड्याला गरजेपुरता निधी देण्यात मी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठेही कमी पडणार नाही. मोठ मोठे प्रकल्प करायचे असल्यास एकट्या राज्य सरकारच्या बजेटमध्ये ते होत नाहीत. त्यासाठी केंद्राच्या निधीची आवश्यकता असते. पुण्याच्या सभेत मी मोदींना सांगितलं, तुम्ही संपूर्ण देशात प्रचार करता. आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जातो.

कांद्याची निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी मी त्यांच्याकडे केली. कारण कांद्याच्या शेतीवर त्या शेतकऱ्यांचा प्रपंच आहे. संपूर्ण कुटुंब त्या कांद्याच्या उत्पादनावर अवलंबून आहे. पण कांदा निर्यात बंदीमुळे शेतकरी नाराज होतात आणि त्यांच्या नाराजीचा फटका आपल्याला बसतो. त्यानंतर कांदा निर्यात बंदी उठवण्याचं काम मोदी सरकारच्या माध्यमातून झालं. मी देखील शेतकरी आहे. तुम्हीही शेतकरी आहात. शेतकरी ही आपली जात आहे. दुसरी कोणतीच जात नाही.

बाकीचे लोक राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी जातीपातीचं राजकारण करतात. आम्हाला पण बोलता येतं, पण आम्ही तारतम्य ठेऊन बोलत असतो. कारण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची आम्हाला शिकवण आहे. ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे. महाराष्ट्रातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्याला आणि सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यासाठी आम्ही बजेटमध्ये ४ हजार कोटी रुपये बाजूला ठेवले आहेत, असंही अजित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com