'H3N2’ने महाराष्ट्र बाधित होणार नाही यासाठी तात्काळ उपाययोजना करा; विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी
केंद्रसरकारच्या अखत्यारीतील नीती आयोगाच्या बैठकीनंतर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ‘एच३ एन२’ फ्ल्यू संदर्भात काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. या ‘एच३एन२’ फ्ल्यूचा प्रसार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात वाढत आहे. तरी या आजाराने महाराष्ट्र बाधित होऊ नये यासाठी सरकारने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली.
‘एच३एन२’ फ्ल्यूच्या प्रकारातील शीतज्वराची महाराष्ट्रासह देशात लाट आलेली आहे. वातावरणातील बदल, धुळीचे प्रमाण यामुळे ही साथ वाढली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सर्दी, तीव्र खोकला, ताप, अंगदुखी याशिवाय मळमळ, उलट्या आणि अतिसार अशी लक्षणे रुग्णांमध्ये आठवडाभर राहत आहेत. नुकतेच कर्नाटक व हरियाणामध्ये या ‘एच३ एन२’ फ्ल्यूने दोन मृत्यु झाल्याची घटना घडली असून पाच वर्षाखालील मुले, ६५ वर्षावरील वृध्द व्यक्ती, गर्भवती महिला याशिवाय हृदयरोग, मधूमेह व दम्याच्या रुग्णांना याची लवकर लागण होत आहे.
यामुळे गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी आवाहन केलेले आहे. राज्यातही 'एच३एन२' चे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. कोवीड-१९ साथ रोगाचा अनुभव विचारात घेता झपाट्याने वाढलेले प्रमाण व वाढलेली रुग्ण संख्या यांचा विचार करता राज्य शासनाने 'एच३एन२' बाबतही योग्य उपाययोजना करण्याची मागणीही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.