अमरावतीच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले; "नवनीत राणांवर चुकीचे आरोप..."
मागील निवडणुकीत नवनीत राणा विरोधी पक्षाकडून निवडून आल्या होत्या. आता त्या सत्ताधारी महायुती पक्षाकडून उभ्या आहेत. त्यांचं संसदेतील काम तुम्ही पाहिलं आहे. काही लोक त्यांच्यावर चुकीचे आरोप करतात. आपला महाराष्ट्र शीव, फुले-शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी आम्ही राज्यकर्ते काम करत आहोत. सत्ता येते सत्ता जाते. ताम्रपट कुणीच घेऊन जन्माला आलेला नाही. सत्तेचा वापर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी केला पाहिजे. यासाठी देशाला खंबीर नेतृत्व हवं असतं. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, पण दुसरीकडे खिचडी झाली आहे. विरोधकांमध्ये कुणीच नेतृत्व करु शकत नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेससह इंडिया आघाडीवर टीका केली. ते अमरावतीत महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
अजित पवार पुढे म्हणाले, राहुल गांधी त्यांचा नेता आहे. राहुल गांधीं गेले अनेक वर्ष खासदार म्हणून काम करतात. मनमोहन सिंग यांच्या काळात त्यांनी मंत्रिपद घेऊन त्या मंत्रिपदाला न्याय द्यायला पाहिजे होतं, पण त्यांनी घेतलं नाही. तो त्यांचा अधिकार आहे, तो त्यांचा अधिकार आहे. मोदींची दहा वर्षांची कारकिर्द समोर ठेवा. देशाचा गाडा पुढं नेण्यासाठी प्रश्नांची जाण असणारं नेतृत्व हवं असतं. चोवीस तासातले १८-२० तास काम करणारं नेतृत्व हवं असतं. जगातील प्रश्नांची तुम्हाला माहिती हवी असते. या सर्व गोष्टी नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहायला मिळतात. म्हणून त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे. ते सांगतात, हा तर ट्रेलर होता. पिक्चर अजून बाकी आहे. त्यांची प्रशासनावार जरब आहे. पाकिस्तानसारखं राष्ट्र सातत्याने कुरघोड्या करायचा. पुलवामाच्या हल्ल्यानंतर पाकिस्नाला दणका दिला. त्यानंतर पाकिस्तानचा पेकाटच मोडून काढला. परत पाकिस्तानने आवाज काढला नाही. त्या पाकिस्तानची दयनीय अवस्था आहे.
मोदींच्या रुपात एक कर्तबगार नेता या देशाला मिळाला आहे. जगात पाचव्या क्रमांकावर भारताची अर्थव्यवस्था नेली आहे. आता तिसऱ्या क्रमांकावर भारताची अर्थव्यवस्था नेण्याचं मोदींचं लक्ष्य आहे. त्यामुळे गुंतवणूक वाढणार आहे. जीडीपी वाढणार आहे. मी शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो आहे. मला शेतकऱ्याचं दु:ख कळतं. मी जरी उपमुख्यमंत्री असलो, तरी माझी शेतीवाडी मीच करतो. आम्ही महायुतीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मदत घेऊ. त्यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. दूध-उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचं दर कमी झालं.
गायीच्या दुधाला रोज पाच रुपये लिटरला राज्य सरकार सबशिडी देतो. पैसै देत असताना काही तांत्रिक अडचणी येतात आणि शेतकऱ्यांपर्यंत थेट मदत पोहोचत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना थेट मदत पोहचण्यासाठी आम्ही निर्णय घेतला. गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी, कोणत्याही प्रकारचं नैसर्गिक संकट आलं तर एनडीआरफ आणि एसडीआरफच्या रुपात मोदी आणि शहा आम्हाला राज्य सरकारला मदत करतात. एक रुपयात पिक वीमा दिला. बाकी पैसे राज्य सरकार आणि केंद्र सरकार भरतात. ८० कोटी जनतेला मोफत रेशन देण्याचं काम मोदींनी केला. कुणाला उपाशीपोटी झोपू देणार नाही, ही भूमिका मोदींची आहे.
३ कोटी लोकांना घरं बांधून देणार. याआधी आदिवासी, मागासवर्गीयांना घरं मिळायची. बाकीच्या बहुजन समाजाचे लोक म्हणायचे आमच्यातही गरिबी आहे. ज्याच्याकडे स्वत:चं घर नाही, अशा ३ कोटी लोकांना घरं देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येकाच्या घरात पाच लोक असतील, तर १५ कोटी लोकांना त्याचा लाभ घेता येणार आहे. मोदींचं तिसऱ्यांदा सरकार आल्यावर ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देणार आहोत. आपल्याकडे सूर्यप्रकाश खूप आहे. सोलारवर आम्ही प्रचंड मोठी वीज निर्माण करणार आहोत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी साडेआठ लाख सोलारचे पंप देण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री कधी बिबट्याचा त्रास असतो. कधी सापाचा त्रास असतो. म्हणून दिवसाढवळ्या वीज असल्यावर शेताला पाणी देतात येणार आहे. रात्री अपरात्री शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, असंही अजित पवार म्हणाले.