Ajit Pawar
Ajit Pawar

"...म्हणून मी तुमच्याकडे मत मागायला आलोय", साताऱ्याच्या सभेत अजित पवारांनी सांगितलं खरं कारण

एक एक खासदार नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्यासाठी दिल्लीला गेला पाहिजे, असं मोठं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. ते साताऱ्यात महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
Published by :

Ajit Pawar Satara Speech : छत्रपती शिवाजी महाराजांपुढे आपण नतमस्तक होतो. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो. अठरा पगड जाती बाराबलुतेदारांना, मावळ्यांना सोबत घेऊन महाराजांनी त्या काळात हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तो आदर्श आपल्या सर्वांसमोर आहे. विकासासाठी आपण काम करुया. मी विकासासाठी तुमच्याकडे मत मागायला आलो आहे. मोदींना देशाचे विकासपुरुष म्हणून ओळखलं जातं. नरेंद्र मोदी जगात सर्वात लोकप्रिय नेते आहेत. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. यासाठी एक एक खासदार त्यांना पाठिंबा देण्यासाठी दिल्लीला गेला पाहिजे, असं मोठं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला संबोधीत करताना केलं. ते साताऱ्यात महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

अजित पवार पुढे म्हणाले, निवडणुका येतात आणि जातात. पण सर्वसामान्य माणूस म्हणतो, त्यामुळे आम्हाला काय फरक पडतो, देशात लोकसभेच्या निवडणुका सुरु आहेत. निवडणुकांचा पहिला आणि दुसरा टप्पा झाला, तिसरा टप्पा उद्या ७ तारखेला आहे. सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत मतदान आहे. आमचे एकनाथ शिंदे सागंतात, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. हे तुमचं आमचं सरकार आहे. मी, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे ही कामं करत असताना माझाही हाच प्रयत्न आहे. मला पहिल्यांदाच राजकीय जीवनात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ मला घ्यावी लागली. त्यानंतर या जिल्ह्याचं पहिलं पालकमंत्रिपद मला मिळालं. हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा जिल्हा आहे.

जीवाला जीव देणारे कार्यकर्ते इथे आहेत. याचा अनुभव मी १९९९-२००४ मध्ये घेतला. त्यामुळे अनेक वेगवेगळ्या भागात ओळखी झाल्या. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणून आता ६४ वर्षे पूर्ण झाली. यशवंतराव चव्हाण साहेब किती कर्तबगार नेते आहेत, हे त्यावेळी देशाला आणि जगाला कळलं. मी चव्हाण साहेबांची अनेक पुस्तके वाचली. चव्हाण साहेबांवरही राजकीय संकटे आली. त्यांच्या जीवनात चढ-उतार आहे. त्याचे आपण सर्व साक्षीदार आहोत. बहुजन समाजाला खऱ्या अर्थ्याने मदत करायची असेल, तर सरकारमध्ये जाऊनच तुम्हाला तशी मदत करावी लागते. मी ताम्रपट घेऊन जन्माला आलो नाही.

मी सत्तेला हापापलेला माणूस नाही. पण चव्हाण साहेबांचे विचार, त्यांनी दाखवलेला रस्ता मला माहितीय. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न मिळाला पाहिजे, अशी मागणी मी यावेळी प्रसिद्ध केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात केलीय. स्वर्गवासी झाल्यानंतरही काहींना अशाप्रकारचे पुरस्कार मिळाले आहेत. काळाच्या नियतीच्या पुढे कुणाचच चालत नाही. येणाऱ्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं. बाकिच्यांना सावरावं लागतं. आज मकरंद आबा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना कमी दिवस मिळाले आहेत. महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले साताऱ्याचे गादीचे वारस आहेत. त्या कमी दिवसात चोवीस तास काम करून त्यांना निवडून आणायचं आहे, असंही पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com