Vijay Wadettiwar : काँग्रेसची मतं फोडण्यासाठी अजित पवारांना युतीबाहेर ठेवलं.. वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप

Vijay Wadettiwar : काँग्रेसची मतं फोडण्यासाठी अजित पवारांना युतीबाहेर ठेवलं.. वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप

राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र झाले आहेत.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र झाले आहेत. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजप–सेना युतीवर गंभीर आरोप करत मोठा दावा केला आहे. “राज्यात सत्ता चालवताना अजित पवार चालतात, मात्र महानगरपालिका निवडणुकीत त्यांना मुद्दाम युतीबाहेर ठेवण्यात आले आहे. काँग्रेसची मते फोडण्याच्या हेतूनेच हा डाव रचण्यात आला आहे,” असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

चंद्रपूर येथे आयोजित एका प्रचारसभेत बोलताना वडेट्टीवार यांनी थेट भाजप आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. “सत्तेत असताना अजित पवार यांच्याशिवाय सरकार चालू शकत नाही. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप–सेना युतीने अजित पवारांना बाहेर ठेवले. हे अपघाताने नाही, तर ठरवून करण्यात आले आहे,” असे ते म्हणाले. या निर्णयामागे काँग्रेसची पारंपरिक मतदारसंख्या विभागण्याचा उद्देश असल्याचा आरोपही त्यांनी केला.

वडेट्टीवार यांनी यावेळी अजित पवार यांच्या धर्मनिरपेक्षतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “जे व्यक्ती धर्मांध शक्तींशी सत्तेत सहभागी आहेत, त्यांना धर्मनिरपेक्ष कसे म्हणायचे?” असा सवाल करत त्यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली. काँग्रेस हा धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणारा पक्ष असून, त्याच्या मतांवर डोळा ठेवूनच हे राजकीय डावपेच आखले जात असल्याचा दावा त्यांनी केला.

विशेष म्हणजे, या निवडणुकीत भाजप हा प्रमुख विरोधक असताना वडेट्टीवार यांनी अजित पवारांना लक्ष्य केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काही राजकीय विश्लेषकांच्या मते, महापालिका निवडणुकांमध्ये त्रिकोणी लढतीचा फायदा सत्ताधाऱ्यांना व्हावा, यासाठीच राष्ट्रवादी अजित पवार गटाची भूमिका वेगळी ठेवण्यात आली आहे. यामुळे विरोधकांची मते विभागली जाऊन भाजप–सेना युतीला थेट लाभ होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.

वडेट्टीवार यांनी पुढे सांगितले की, “जनतेने हे राजकारण ओळखले पाहिजे. सत्ता टिकवण्यासाठी आणि विरोधक कमकुवत करण्यासाठी सत्ताधारी कोणत्याही थराला जाऊ शकतात.” महापालिका निवडणुका या स्थानिक स्वराज्याच्या असल्या तरी त्यामागे मोठे राजकीय गणित दडलेले असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, वडेट्टीवार यांच्या या आरोपांवर भाजप किंवा अजित पवार गटाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसून, या विधानांमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com