Ajit Pawar : "...पण पैशांचं सोंग आणता येत नाही", लाडक्या बहिणींना 2100 मिळणार? काय म्हणाले अजित पवार

Ajit Pawar : "...पण पैशांचं सोंग आणता येत नाही", लाडक्या बहिणींना 2100 मिळणार? काय म्हणाले अजित पवार

अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वाचे वक्तव्य केले. 2100 रुपये देण्याचे आश्वासन पाळणार का? जाणून घ्या अधिक.
Published by :
Prachi Nate
Published on

सध्या संपुर्ण राज्यभर गाजलेली योजना म्हणजे महायुती सरकारनं महिलांसाठी सुरु केलेली लाडकी बहिण योजना. लाडकी बहीण योजनेवरुन अनेक चर्चा सुरु आहेत. लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांच्या बॅंक अकाऊंटमध्ये दरमहा पैसे जमा होतात. आतापर्यंत अडीच कोटी महिलांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात आला आहे. नुकताच फेब्रुवारी आणि मार्चचा हफ्ता महिलांच्या खात्यात जमा झाल. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता हा ८ मार्च महिला दिनी देण्यात आला होता.

त्यामुळे आता लाडक्या बहिणी एप्रिल महिन्याच्या हफ्त्याची वाट पाहत आहेत. दरम्यान 2100 रुपये देण्याचं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी केल होत. तर या योजनेमुळे सरकारवर आर्थिक भार वाढल्याची माहिती समोर आली होती. यामुळे आता लाडक्या बहिणींना दिलेलं आश्वासन महायुतीचे नेते पाळणार की नाही असा प्रश्न महिलांच्या मनात असताना राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नांदेडमधील सभेत बोलताना एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

“आम्ही ही योजना बंद करणार नाही“ - अजित पवार

"शासनाच्या तिजोरीत खडखडाट असल्याचं अनेक जण बोलतात. कृपा करून तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. आम्ही ही योजना बंद करु असं विरोधक म्हणत होते. अनेक महिला भेटल्या, त्यांनीही मला विनवलं 1500 रुपये देता 2100 रुपये द्या. यावर मी नाही म्हटलेलं नाही. ज्यावेळेस राज्य सरकारची परिस्थिती ही अधिक योग्य होईल त्यावेळी तुम्हाला 2100 रुपये देणार. पण आता मी सगळा हिशोब केला. तुम्ही जसा तुमचा संसार करताना महिन्याचा हिशोब लावता तसा मला राज्याच्या जनतेच्या 365 दिवसांचा हिशोब लावावा लागतो. शेतकऱ्यांना काय द्यायचं, कामगारांना काय द्यायचं, मागासवर्गीयांना काय द्यायचं, अल्पसंख्यांकांना काय द्यायचं, ही सगळी सोंग करता येतात पण पैशांचं सोंग करता येत नाही“.

“...त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही”- अजित पवार

“मला आणि सरकारला लाडकी बहिण योजना चालू ठेवायची आहे. त्यामुळे आम्ही नवीन पर्याय शोधत आहोत. काही बँकांना आम्ही यासाठी तयार केलं आहे. जर तुम्हाला 50 हजार कर्ज काढून, एकत्र येऊन व्यवसाय करायचा आहे, आणि लाडक्या बहिणींमध्ये ज्या 20 एक महिला या योजनेत बसतात त्यांनी एकत्र येऊन साधारण 10 लाख रुपये घेऊन तुम्ही तुमचं काम करू शकता. हा उपाय राज्य सरकारने आणला आहे. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही तिजोरीत खडखडाट आहे असे समजू नका. मी आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न करतोय असे अजित पवार म्हणाले", असे अजित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com