'एक-दोन उद्योग गेल्यानं राज्याचं नुकसान होणार नाही' राज ठाकरेंच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया
जागतिक मराठी संमेलनात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रोखठोक मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र हा श्रीमंत आहे, सर्वार्थाने अग्रेसर आहे. जे आहे ते जरी टिकवल तरी महाराष्ट्र पुढे आहे. एखादं दोन उद्योग बाहेर गेले तरी काही फरक पडत नाही असं ते म्हणाले. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर जाणं, हे अतिशय चुकीचं आहे. त्यातून बेरोजगारी, बेकारी प्रचंड वाढत आहे. असे असताना मग मुलांनी काम कुठं मागायचं. लाखो कोटी रुपयांचं प्रकल्प गेल्याने रोजगार बुडाला आहे असं अजित पवारांनी सांगितलं.
राज्यातून गेलेल्या प्रकल्पावरून राजकीय व्यक्ती समर्थन करत असेल तर दुर्दैव आहे. प्रत्येक प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासाठी सर्व राज्यकर्त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे आर्थिक सुबत्तता निर्माण होऊन तेथील भागात रोजगार निर्माण होतील असं अजित पवारांनी यावेळे म्हटलं आहे.
दरम्यान, “महाराष्ट्र हा सर्वार्थाने श्रीमंत आहे. महाराष्ट्राचं काय होणार? असा टाहो आपण उगाच फोडत असतो. आपल्याकडे जे आहे, ते जरी टीकवलं तरी महाराष्ट्र सर्वांच्या पुढे आहे. राज्यातून एक-दोन उद्योग बाहेर गेल्याने महाराष्ट्राचं काहीही नुकसान होणार नाही. मात्र, आपण महाराष्ट्र जोपसणं गरजेचं आहे. प्रत्येकाने या गोष्टीकडे नीट बघणं आवश्यक आहे”, असं राज ठाकरे म्हणाले होते.