Ambadas Danve : अंबादास दानवे यांचे राज्यपालांना पत्र; पत्रात काय?

Ambadas Danve : अंबादास दानवे यांचे राज्यपालांना पत्र; पत्रात काय?

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना पत्र लिहले आहे.
Published on

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना पत्र लिहले आहे. या पत्रात अंबादास दानवे यांनी म्हटले आहे की, आदरणीय महोदय, राज्याच्या प्रशासकीय क्षेत्रातील अतिशय महत्वाच्या असलेल्या मुख्य सचिव या पदी राज्य शासनाने श्रीमती सुजाता सौनिक यांची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती ही एक ऐतिहासिक घटना आहे.

भारतीय प्रशासकीय सेवतील (IAS) सन १९८७ बॅचच्या अधिकारी असून, त्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत तीन दशकांहून अधिक अनुभव आहे. त्यांच्या विविध महत्त्वाच्या पदांवरील कार्यानंतर सन २०२४ मध्ये त्यांना या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. तथापि, गत काही महिन्यांपासून राज्य सरकार श्रीमती सुजाता सौनिक यांना विविध कारणांनी राजीनामा देण्यासाठी दबाव आणत आहे. त्यांनी शासनाच्या निर्णयांना विरोध केल्यामुळे त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात येत आहे.

याशिवाय, राजीनामा दिल्यास त्यांचे पती व राज्याचे माजी मुख्य सचिव श्री. मनोज सौनिक यांना महत्त्वाच्या पदी नियुक्ती देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून देण्यात आला असून सदरहू प्रस्ताव नाकारल्यास त्यांना कायदेशीर बाबीमध्ये अडकवण्यात येणार असल्याची सर्वत्र चर्चा आहे, त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

याचप्रकारे राज्य सरकारच्या धोरणांच्या विरोधात असलेले श्रीमती व्ही. राधा व श्री. आय.ए. कुंदन यांच्या सारख्या अनेक भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी यांना अति महत्वाच्या विभागातून बदली करून त्यांना कमी महत्त्वाच्या विभागामध्ये पाठविण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील विविध विभागामध्ये कार्यरत असलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यामध्ये राज्य सरकार प्रती असंतोषाची भावना निर्माण झाली असल्याची बाब माझ्या निदर्शनास आली आहे. सदरहू बाब गंभीर स्वरुपाची आहे. तरी उक्त प्रकरणी आपण तात्काळ चौकशी करुन प्रशासनाच्या कामात होत असलेला राजकीय हस्तक्षेप टाळून महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय प्रणाली पारदर्शक आणि तटस्थ ठेवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत राज्य सरकारला निर्देश द्यावेत, ही विनंती. धन्यवाद. असे अंबादास दानवे यांनी पत्रात म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com