Ambadas Danve : पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणात अंबादास दानवे यांचे मोठा खुलासा

Ambadas Danve : पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणात अंबादास दानवे यांचे मोठा खुलासा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले. पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणात पार्थचे नाव आले असून त्याची कंपनी अमेडियाकडून हा व्यवहार सुरू होता.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • वर्षा बंगल्यातील बैठकीबद्दल अंबादास दानवेंचा गाैप्यस्फोट

  • अंबादास दानवे यांनी मोठा खुलासा

  • मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशिवाय पार्थ पवार वाचू शकत नाही.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले. पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणात पार्थचे नाव आले असून त्याची कंपनी अमेडियाकडून हा व्यवहार सुरू होता. हा व्यवहार रद्द करण्यात आल्याचे अजित पवारांनी म्हटले. मात्र, अजूनही पार्थ पवार याच्यावर गुन्हा दाखल झाला नसल्याने विरोधकांकडून टीका केली जात आहे. नुकताच आता ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप करत म्हटले की, भाजपाकडून पार्थ पवारला वाचवले जात आहे. वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत अजित पवारांनी मी राजीनामा देतो आणि सरकारला बाहेरून पाठिंबा देतो अशी भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर होणाऱ्या आरोपांनंतर घेतल्याचा गाैप्यस्फोट त्यांनी केला.

अंबादास दानवे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीनेच अडचणीत आणायचे.. भारतीय जनता पार्टीनेच बाहेर काढायचे हे काम या प्रकरणात करण्यात आलंय. कंपनीचा डायरेक्टर असतानाही पार्थ पवारावर गुन्हा दाखल का होत नाही? मुद्रांक शुल्क चुकवले जाते म्हणून कारवाई होते. व्यवहारच झाला नाही तर मुद्रांक शुल्क का भरायचे असे सांगितले जाते. मात्र, जोपर्यंत मुद्रांक शुल्क भरले जात नाही, तोपर्यंत व्यवहार रद्द होत नाही हा नियम आहे. जर एखादा व्यवहार रद्द केला तर तेवढेच मुद्रांक शुल्क सरकारला भरावे लागते. बावनकुळेंनी घेतलेली भूमिका चुकीची आहे. पार्थ पवारला भारतीय जनता पार्टी वाचवत आहे. पार्थ पवार काय लहान बाळ आहे का? ज्याने लोकसभा लढवली आहे आणि लोकसभा लढणारा माणूस काही बाळ नाहीये. कुणाचा मुलगा म्हणून त्याला वागणूक देऊ नये, भारताचा एक नागरिक म्हणून आणि गुन्हेगार म्हणून त्याला वागणूक दिली पाहिजे.

एका तहसीलदाराची इतकी क्षमता थोडी आहे. जिल्हाधिकारी का यातून बाजुला आहेत? कोणाच्यातरी सांगण्याशिवाय तहसीलदार इतकी जास्त हिंमत करू शकत नाही. एका तहसीलदाराचा बळी देऊन पार्थ पवार आणि इतर बड्या बड्या अधिकाऱ्यांना वाचवणे चूक आहे. पार्थ पवारवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशिवाय पार्थ पवार वाचू शकत नाही. त्यादिवशी वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकांमध्ये मला मिळालेला माहितीनुसार. अजित पवारांनी रागाने, त्वेशाने सरकारमधून बाहेर पडून बाहेरून पाठिंबा देतो, अशी भूमिका घेतल्याचे माझ्या कानावर आहे. दाव्याने हे बोलतोय. खरे खोटे बाहेर येईलच. अशाप्रकारे पार्थ पवारांना वाचवले जातंय. हे सर्व होणार याची कल्पना भारतीय जनता पार्टीला होती, असेही अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com