विसर्जनानंतर दादर चौपाटीवर स्वच्छता मोहीम, मनसे नेते अमित ठाकरे यांचाही सहभाग
अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईसह कोकणात हजारो सार्वजनिक मंडळ तसेच घरगुती गणेशमूर्तींचे भक्तीभावाने समुद्रात विसर्जन केले जाते. मात्र दुसऱ्या दिवशी या गणेशमूर्तींपैकी अनेक मूर्तींचे अवशेष भरतीच्या लाटांसोबत समुद्र किनाऱ्यावर येतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी अनंत चतुर्दशीनंतर म्हणजेच १० सप्टेंबर रोजी मुंबईसह राज्यातील एकूण 13 समुद्र किनारे स्वच्छ करण्याची मोहिम हाती घेतली आहे.
यासाठी राज्यभरात १० सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते १० या दोन तासांत मनसे आपले समुद्र किनारे आपली जबाबदारी ही मोहीम राबवत आहेत. ज्यात अमित ठाकरेंच्या पुढाकाराने राज्यातील 13 समुद्र किनारे चकाचक केले जाणार आहेत.
मुंबईमध्ये गिरगांव, दादर, माहिम, वांद्रे, जुहू, वर्सोवा, अक्सा या समुद्र किनाऱ्यांवर, रायगड जिल्ह्यात उरण, वर्सोली, नागाव, अलिबाग, मुरुड या समुद्र किनाऱ्यांवर तर रत्नागिरीत मांडवी येथे महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेना समुद्र किनारा स्वच्छता मोहीम राबविणार आहे. स्वतः अमित ठाकरे दादर समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभागी झाले. मनसेचे पदाधिकारी समुद्र किनाऱ्यांवर वाळूत रुतलेले गणेश मूर्तींचे अवशेष तसंच निर्माल्य गोळा करून ते महापालिका प्रशासनाकडे सोपवणार आहेत.