'बदला घेण्यासाठी आढळराव पाटील निवडणूक लढणार असतील तर...' अमोल कोल्हेंची टीका

'बदला घेण्यासाठी आढळराव पाटील निवडणूक लढणार असतील तर...' अमोल कोल्हेंची टीका

गेल्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटलांचा पराभव केला होता.
Published by :
shweta walge

शिवाजी आढळराव पाटील गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी चर्चा होती. त्याला आज दुजोरा मिळाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर आढळराव पाटलांनी येत्या २६ मार्च रोजी राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचं सांगितले आहे. मागील निवडणुकीचा बदला घेण्यासाठी आपण निवडणुकीला उभे राहणार असून यावेळी निवडून येणार याची 100 टक्के खात्री आहे. ही निवडणूक हे सर्व रेकॉर्ड तोडणारी असेल, असे शिवाजीराव आढळराव पाटलांनी म्हटले होते. यावरच खासदार अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर देत 2019 चा बदला घेण्यासाठी शिवाजीराव आढळराव पाटील निवडणूक लढणार असतील तर, माझा प्रश्न आहे एका सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलाने लोकसभेत जाऊच नये का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

दरम्यान, गेल्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटलांचा पराभव केला होता.

अमोल कोल्हे म्हणाले की, 2019 चा बदला घेण्यासाठी शिवाजीराव आढळराव पाटील निवडणूक लढणार असतील तर, माझा प्रश्न आहे एका सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलाने लोकसभेत जाऊच नये का? का फक्त परदेशात कंपन्या असणाऱ्यांच माणसाला लोकसभेत जाण्याचा अधिकार आहे, हा प्रश्न माझ्या मनात येतो.

दुसरी गोष्ट म्हणजे निवडणुकीला सामोर जाण्याचा कोणाचा काय हेतू आहे, हे ही स्पष्ट होत. त्यांच विधान पाहिले तर त्यांना 2019 चा बदला घ्यायचा आहे, मला मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांचा, सर्वसामान्य नागरिकांचा, महाराष्ट्रातील जनतेचा, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आवाज हा दिल्लीत घुमत राहावा यासाठी मायबाप जनतेकडे मी आशिर्वाद मागतोय. त्यासाठी मी या निवडणुकीत उभा आहे. त्यांना जर बदला वाटत असेल तर मायबाप जनता सुज्ञ आहे.

कोणी महायुतीत जाण हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण यापद्धतीने जे प्रकार सुरु आहेत त्यामध्ये भाजपचा कॉन्फिडन्स खचलेला दिसतोय. अब की बार 400 पार म्हणणं असताना जेमतेम ते 200 चा आकडा ते गाठू शकतील अशी वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्राची भूमिका ही फार महत्वाची राहणार आहे. एकीकडे शिवसेना फोडून झाली, राष्ट्रवादी फोडून झाली तरी सुद्धा मनसेला बरोबर घेताय, तरी सुद्धा परिस्थिती भाजपला फेव्हरेबल अशी नाहीये.

महाराष्ट्र हा कायम विचारांच्या मागे उभा राहिला आहे, महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा येत्या निवडणुकीत नक्की दिसेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com