पुढील आदेश येईपर्यंत कांदा निर्यात बंदी कायम; अमोल कोल्हे म्हणाले...
कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना दिलासा अजूनही दिलासा मिळाला नाही आहे. 7 डिसेंबर 2023ला निर्यात बंदीचा आदेश काढला होता. 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यात बंदी होती. पुढील आदेश येईपर्यंत आता कांदा निर्यात बंदी कायम ठेवण्यात आली आहे. कांद्याचे दर स्थिर राहण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी लागू केली होती. केंद्र सरकारनं कांदा निर्यातीबाबत परिपत्रक काढत ही माहिती दिली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमोल कोल्हे म्हणाले की, आज केंद्र सरकारचे पुन्हा कांदा निर्यात बंदी ही 31मार्चच्या पुढेसुद्धा वाढवण्याचे नोटिफिकेशन आलं आहे. ते पाहता या मोदी सरकारचं शेतकरी विरोधी धोरणाचा चेहरा पुन्हा एकदा उघड झालेला आहे.
दुर्देव हे आहे की महाराष्ट्रातील दिग्गज नेते हे जागावाटपासाठी वारंवार दिल्लीच्या वाऱ्या करतात. परंतु सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आवाज उठवण्याला यांच्याकडे वेळ नसावा हे खरोखर दुर्देव आहे. या निर्णयाचा मी पुन्हा एकदा निषेध करतो आणि या निर्णयाने मोदी सरकारचा शेतकरी विरोधी चेहरा समोर आला हे स्पष्ट होतं. असे अमोल कोल्हे म्हणाले.