Indrayani Bridge Collapsed : मावळ तालुक्यातील इंद्रायणीवरील पूल कोसळला! 20 ते 25 जण बुडाल्याची भीती
मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे काही वेळापूर्वी तळेगाव दाभाडे शहराजवळील कुंडमळा परिसरात आज इंद्रायणी नदीच्या काठावरील जुना पूल कोसळल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेत सुमारे 20 ते 25 पर्यटक पाण्यामध्ये वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रविवार असल्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी सहलीसाठी आले होते. मात्र अचानक पूल कोसळल्यामुळे अनेकजण पाण्यात पडले. सध्या या परिसरात मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला जोरदार प्रवाह आहे, त्यामुळे बचाव कार्याला अडचणींचा सामना करावा लागत आहे.
घटनेनंतर स्थानिक नागरिक व उपस्थित पर्यटकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. घटनेची माहिती पोलिसांनाही दिली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून त्यामुळे नदीतील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. पूल जुनाट असल्यामुळे त्यावरून वाहतुकीस धोका निर्माण झाला होता, अशी प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेची अधिक चौकशी सुरू असून प्रशासनाकडून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती