शेतकऱ्यांच्या शेतीचा लिलाव थांबवा, अनिल देशमुख यांची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
कल्पना नळसकर - असूर, नागपूर
नागपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके कडुन नागपूर जिल्हातील शेतकऱ्यांवरील थकीत कर्ज वसुली करीता शेतकऱ्यांच्या शेतजमिनी लीलावामध्ये काढलेल्या आहेत. परंतु शेतकऱ्यांची परिस्थिती ही हालाकीची असल्याने त्यांना कर्ज फेडता येणार नाही. त्यामुळे या लिलाव प्रक्रियेस स्थगिती देण्यात यावी अशी मागणी माजी गृहमंत्री तथा आमदार अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलेली मदत ही फार कमी आहे. दुसरीकडे नागूपर जिल्हात अतिवृष्टीमुळे संत्रा व मोसंबीचे मोठया प्रमाणात नुकसान होवूनही अद्यापही त्यांची मदत मिळाली नाही. शिवाय नापिकीतुन सोयाबीन व कापूस पिकला त्याला बाजारात योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडुन जे कर्ज घेतले होते ते त्यांना भरता आले नाही. परंतु आता बँकेने कर्ज वसुली करण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या शेतीचे लिलाव करण्याची प्रक्रिया सुरु केल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे नागपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके ृकडुन नागपूर जिल्हात थकीत कर्जाबाबत सुरु असलेल्या लिलावावरील कार्यवाहीस स्थगीती देण्याची विनंती अनिल देशमुख यांनी पत्राव्दारे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

बॅनर लावुन शेतकऱ्यांची बदनामी
ज्या शेतकऱ्यांवर थकीत कर्ज आहे आणि ज्यांच्या शेतीचा लिलाव होत अश्या शेतकऱ्यांची यादी बॅनरच्या माध्यामातुन चौका चौकात लावण्यात आले आहे. यामुळे आर्थीक अडचण असल्याने चिंतते असलेल्या शेतकऱ्यांची नाहक बदनामी करण्यात येत आहे. या गंभीर बाबीचा सुध्दा अनिल देशमुख यांनी आपल्या पत्रात उल्लेख केला आहे.