IPhone Production : टॅरिफ वॉरचा भारताला फायदा, अॅपलचं उत्पादन आता भारतातच
अमेरिका आणि चीनमधील सुरू असलेल्या टॅरिफ वॉरमुळे भारताला मोठा फायदा होत आहे. जागतिक आयटी दिग्गज अॅपलने अमेरिकेसाठी असेंबल होणाऱ्या सर्व आयफोनचे उत्पादन चीनहून भारतात हलवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील दोन वर्षांत अमेरिकेत विकले जाणारे सर्व आयफोन "मेड इन इंडिया" असतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ धोरणानुसार भारतातून आयातीवर 26%, चीनवर 145%, आणि व्हिएतनामवर 46% आयात कर लादला आहे. यामुळे अॅपलचे चीनवरील उत्पादन अवलंबित्व कमी करण्यावर लक्ष केंद्रित झाले आहे.
सध्या जगभरात विकल्या जाणाऱ्या आयफोनपैकी 80% चीनमध्ये आणि केवळ 20% भारतात तयार होतात. मात्र, नव्या योजनेनुसार भारतातील आयफोन असेंब्ली क्षमता दुप्पट होणार आहे. फॉक्सकॉन सध्या भारतात 67% आयफोन तयार करते, तर टाटाच्या पेगाट्रॉन आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्स उर्वरित उत्पादन हाताळतात. आयफोन उत्पादनाची प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची आहे, ज्यामध्ये 1000 हून अधिक सुटे भाग जगभरातून आयात करावे लागतात. तज्ज्ञांच्या मते, या निर्णयामुळे भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्राला मोठा चालना मिळणार आहे.
फक्त अॅपलच नाही, तर गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट इंक देखील त्यांच्या पिक्सेल स्मार्टफोनचे उत्पादन भारतात स्थलांतरित करण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंत 60% पिक्सेल फोन चीनमध्ये बनत होते, तर 30-40% व्हिएतनाममध्ये. ट्रम्प प्रशासनाने व्हिएतनामवरही 46% टॅरिफ लागू केल्याने गुगलने भारताकडे मोर्चा वळवला आहे. यासाठी अलीकडेच डिक्सन टेक्नॉलॉजी आणि फॉक्सकॉनसोबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली आहे. 2024 मध्ये 1.12 कोटी पिक्सेल फोनचे उत्पादन झाल्याचे नोंद असून, 2025 मध्ये हे उत्पादन 1.5 कोटींच्या आसपास नेण्याचा गुगलचा मानस आहे.
अॅपल आणि गुगलसारख्या आघाडीच्या कंपन्यांनी भारतात उत्पादन वाढवल्याने देशाच्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला जागतिक व्यासपीठावर नवे स्थान मिळेल. "मेड इन इंडिया"चा नारा आता केवळ घोषवाक्य न राहता, वास्तविकतेत उतरायला सुरुवात झाली आहे.