ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज ऑफलाईन भरण्याची परवानगी, राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली माहिती
निवडणूक आयोगाची वेबसाईट चालत नसल्याने राज्यभरात गोंधळ उडाला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांना रात्रभर जागून काढावी लागत होती. औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील बिडकीन गावात गेल्या दोन दिवसांपासून 50 पेक्षा अधिक उमेदवार आपला अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन केंद्रात रात्र जागून काढत आहे. मात्र, असं असताना उमेदवारांना दोन दोन दिवस अर्ज भरण्यासाठी लागत होता. औरंगाबादमधील अनेक ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरताना वेबसाईट चालत नसल्याचं चित्र पाहायला मिळत होता.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात होते. मात्र सद्या वेबसाईट चालत नसल्याने अर्ज भरण्यासाठी अडचण येत होती. त्यातच उद्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारी अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात यावे अशी मागणी इच्छुक उमेदवार यांच्याकडून करण्यात येत होती. याच पार्श्वभूमीवर आता आता निवडणूक आयोगानं ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज ऑफलाईन भरण्याची परवानगी दिली आहे. तसेच नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी दिली आहे.
अर्ज भरण्यासाठी उद्याचा (2 डिसेंबर) शेवटचा दिवस असल्याने इच्छुक उमेदवारांची धडपड पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या शेवटचा दिवस आहे, मात्र सर्व्हर डाऊन झाल्याने अर्ज भरता येत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळं ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी परवानगी द्यावी अशी आशयाचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी देखील राज्य निवडणूक आयोगाला लिहलं होते. अखेर निवडणूक आयोगानं ऑफलाईन अर्ज भरण्याची परवानगी दिली आहे.