उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
अरविंद सावंत आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अर्ज दाखल करण्याआधी अरविंद सावंत यांनी सिध्दीविनायकाचं दर्शन घेतलं. यावेळी माध्यमांशी बोलताना अरविंद सावंत म्हणाले की, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी मला तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन सन्मानित केलं. आशीर्वाद दिलेत. पूर्ण ठाकरे घराणेच या सगळ्याचं भरभरुन आशीर्वाद मिळतात. यावेळेला खासकरुन मी निव्वळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच नाही तर महाविकास आघाडीचा उमेदवार आहे. विजयाची खात्री आहे. आजही समोर कोण मला कल्पना नाही.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, तुम्ही 2014च्या विधानसभेची आठवण करुन बघा. युती तोडली होती आणि त्यामध्ये एक अहंकार होता की, आम्ही एकटं निवडून येऊ. त्यावेळेला एकट्याच्या जीवावर उद्धवजी ठाकरे साहेबांनी 63 आमदार निवडून आणलं होते. ते सगळं विसरु नका. उद्धवजी ठाकरे साहेब ज्या पद्धतीने आज महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून लोकांच्या हृदय सिंहासनावर बसलेले आहेत. कोविडच्या काळात त्यांनी केलेलं जे काम आहे ते लोक विसरत नाही आहेत. त्यांना महाराष्ट्राने कुटुंब प्रमुख ही उपाधी दिली. त्या कुटुंबप्रमुखाच्या मागे उभा महाराष्ट्र उभा आहे. तुम्ही कितीही सभा घ्या त्याचा परिणाम होणार नाही.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, तुम्ही ज्या पद्धतीने रोज खोटं बोलता आहेत देवाचं नाव घेऊन ते सगळ्या महाराष्ट्राला कळते आहे. ना तुमची भ्रष्टाचाराच्याविरुद्ध लढाई आहे, ना तुम्ही महिलांना सन्मान देत, ना तुम्ही रोजगार देत, ना तुम्ही शेतकऱ्यांना काही दिलासा देत. हे सगळं अपयश झाकायचं कसं ते करण्यासाठी माननीय मोदीजी असतील किंवा आणखीन कुणी असतील ते येऊन इथं जो ढोंगपणा करतायत तो लोकांना कळतो आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तुम्हाला अतिशय वेगळं चित्र दिसेल. असे अरविंद सावंत म्हणाले.