...म्हणून झाला ओडिशा रेल्वे अपघात; पहिल्यांदाच रेल्वेमंत्र्यांनी सांगितले कारण
नवी दिल्ली : कोरोमंडल एक्सप्रेसच्या अपघाताप्रकरणी विरोधक आक्रमकपणे रेल्वेमंत्र्यांचा राजीनाम्याची मागणी करत आहेत. यानंतर आता पहिल्यादांच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांची ओळख पटली असून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे मोठे वक्तव्य रेल्वेमंत्र्यांनी केले आहे. बुधवारी सकाळपासून ट्रॅकवरील वाहतूक पूर्ववत सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अश्विनी वैष्णव म्हणाले की, रेल्वे अपघाताचा कवचशी काहीही संबंध नाही. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी केली आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये बदल झाल्यामुळे हा अपघात झाला आहे. तपास अहवाल येऊ द्या. आम्ही घटनेची कारणे आणि त्यासाठी जबाबदार लोक ओळखले आहेत. सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
सध्या आमचे लक्ष ट्रॅकच्या दुरुस्तीवर आहे. बुधवारी सकाळपर्यंत हा ट्रॅक कार्यान्वित होईल. जेणेकरून या ट्रॅकवरून गाड्या धावू शकतील. पंतप्रधानांनी काल दिलेल्या सूचनांवर वेगाने काम सुरू आहे. काल रात्री ट्रॅकचे काम जवळजवळ पूर्ण झाले. आज एक ट्रॅक पूर्णपणे दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जाईल. सर्व बॉक्स काढण्यात आले आहेत, असे वैष्णव यांनी सांगितले.
दरम्यान, ओडिशाच्या बालासोरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी तीन गाड्यांमध्ये झालेल्या भीषण टक्करमध्ये आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. बचाव आणि मदत कार्यानंतर, रेल्वेने शनिवारी रात्रीच रुळांवरचा बहुतांश मलबा हटवला असून लवकरच ट्रॅक सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.