Pahalgam Terror Attack : पहलगामजवळ हल्ला, छत्रपती संभाजीनगरचे १५० पर्यटक सुखरूप
काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा दहशतवादाने डोके वर काढले असून, मंगळवारी दुपारी पहलगामजवळ पर्यटकांवर झालेल्या गोळीबारात चिंता वाढली आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरातून गेलेले सुमारे १५० पर्यटक सध्या सुरक्षित असून, प्रशासनाने या घटनेवर तत्काळ पावले उचलली आहेत. हल्ल्यावेळी गारखेड्यातील एक जोडपे त्या ठिकाणापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर होते. संभाव्य धोका ओळखून त्यांना तात्काळ श्रीनगर येथे हलवण्यात आले. या दोघांचीही प्रकृती स्थिर असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.
मराठवाडा टुरिझम डेव्हलपमेंट चेंबर्सचे अध्यक्ष जयंत गोरे यांनी सांगितले की, “काश्मीरमध्ये असलेले संभाजीनगरचे सर्व पर्यटक सध्या सुरक्षित आहेत. स्थानिक टूर ऑपरेटर्स, गाइड्स आणि श्रीनगर येथील सुरक्षा यंत्रणांशी आम्ही सतत संपर्कात आहोत.” या घटनेनंतर श्रीनगर जिल्हा प्रशासनाने नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. पर्यटक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मदतीचे दूरध्वनी आणि व्हॉट्सॲप क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आले आहेत:
दूरध्वनी क्रमांक: 0194-2483651, 0194-2457543
व्हॉट्सॲप क्रमांक: 7780805144, 7780938397
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की, “जिल्हा प्रशासन मंत्रालयाशी सातत्याने संपर्कात असून, प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवण्यात येत आहेत.”
राज्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी मंत्रालयाच्या पातळीवरून परिस्थितीचा आढावा घेतला माध्यमांसोबत संवाद साधला . “या प्रकारानंतर तातडीने यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत,”असे त्यांनी स्पष्ट केले.
काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी हालचालींमुळे पर्यटकांमध्ये चिंतेचे वातावरण असले तरी, सरकारी यंत्रणा सतर्क आहेत. पर्यटकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, शक्यतो बाहेर न पडता सुरक्षित ठिकाणी थांबावे आणि गरज असल्यास नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये चिंता वाढली असून, अनेक कुटुंबीय आपल्या नातेवाइकांच्या सुरक्षेची खात्री करून घेत आहेत. काश्मीरमध्ये सुरक्षाव्यवस्था अधिक बळकट करण्यात आली असून, परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. या प्रकाराकडे पर्यटकांच्या कुटुंबीयाचे लक्ष लागले असून, सरकारकडून तातडीने निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.