"७५ टक्के कार्यकर्ते नवनीत राणांच्या विरोधात", लोकसभा निवडणुकीपूर्वी बच्चू कडूंचा हल्लाबोल
अमरावती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यात राजकीय चकमक सुरु आहे. भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचं नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं. परंतु, माजी मंत्री बच्चू कडू यांनी नवनीत राणांविरोधात रणनीती आखण्यास सुरुवात केलीय. दरम्यान, बच्चू कडूंची प्रहार संघटना महायुतीतून बाहेर जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. माजी मंत्री बच्चू कडू माध्यमांशी बोलताना म्हणाले, नवनीत राणांवर मतदारसंघात नाराजी आहे. याचा फायदा आम्ही नक्कीच होईल. त्यांच्या विरोधात आम्ही भाजपचाच उमेदवार उभा करू. राणांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची, आमची आणि लोकांची नाराजी आहे.
बच्चू कडू माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाले, "उमेदवार आम्ही तीन तारखेला अर्ज भरणार आहोत. राणांविरोधात असलेल्या नाराजीचा चांगला फायदा आम्हाला मिळू शकतो आणि इतरही पक्ष आमच्या उमेदवाराला मतं देऊ शकतात. ज्या पक्षाकडून राणा उभे राहत आहेत, त्या पक्षातील ७५ टक्के कार्यकर्त्यांची नाराजी आहे. पर्यायी उमेदवार चांगला असेल, तर आम्ही त्याला निवडून देऊ. याबाबत माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली नाही. त्यांना चर्चा करायची असेल, तर त्यांनी करावी"
लोकशाहीशी बोलताना खासदार नवनीत राणा यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिली होती. राणा म्हणाल्या होत्या, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा हे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, त्याच्यापुढे मी कधीच जाणार नाही. पण त्यांच्यासोबत आमची युवा स्वाभिमानची जी कोअर कमिटी आहे, त्यांच्यासोबत रवी राणा हे आमदार आहेत. ते या पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि मी याच पक्षाची खासदार आहे. मी एक कार्यकर्ता म्हणून या क्षेत्रात काम करत आहे. जे नेते ठरवतील तसं मी काम करेन.