'एकतर जिंकून येऊ, नाहीतर मरून येऊ'; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर लाखोंच्या संख्येने आंदोलनाचा बच्चू कडू यांचा निर्धार

'एकतर जिंकून येऊ, नाहीतर मरून येऊ'; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर लाखोंच्या संख्येने आंदोलनाचा बच्चू कडू यांचा निर्धार

बच्चू कडूंनी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर लाखोंच्या संख्येने आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला.
Published by :
Team Lokshahi
Published on

प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित विभागीय मेळाव्यात कार्यकर्त्यांना सन्मानित करून त्यांच्या मनोबलात मोठी वाढ केली. या कार्यक्रमात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला आणि बच्चू कडू यांनी आपल्या आक्रमक शैलीतून कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश निर्माण केला. "प्रहार हा राज्यातील एकमेव पक्ष आहे जो आपल्या कार्यकर्त्यांचा सन्मान करतो," असे सांगत त्यांनी पदाधिकाऱ्यांना स्पष्ट संदेश दिला. "पक्षात काम करताना काही मिळेल या अपेक्षेने नाही, काय देता येईल, हे पाहा."

दिव्यांगांच्या प्रश्नावर शब्दांत टीका

बच्चू कडूंनी दिव्यांगांच्या मुद्द्यावर बोलताना समाजातील विषमतांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. "मी नसतो तर हे स्टेजवर सोडाच, हॉलमध्येही आले नसते," असे म्हणत त्यांनी समाजातील मानसिकतेवर बोट ठेवले. इतर राज्यातील दिव्यांगांना जास्त मानधन असताना महाराष्ट्रातील दिव्यांगांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, ही प्रमुख मागणी केली

पाण्याच्या प्रश्नावर संताप

"राज्यात २८८ आमदार, खासदार, मंत्री आणि पंतप्रधान आहेत, पण अजूनही लोकांना पाणी मिळत नाही," अशा शब्दांत बच्चू कडूंनी राज्य शासनावर टीका केली. यवतमाळच्या माऊलीच्या मृत्यूचा उल्लेख करत त्यांनी सरकारच्या निष्क्रीयतेवर संताप व्यक्त केला.

नागपूरवर लक्ष केंद्रित, आंदोलनाची घोषणा

बच्चू कडूंनी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर लाखोंच्या संख्येने आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला. "१४ तारखेला चार मंत्र्यांच्या निवासस्थानासमोर रक्तदान शिबिर घ्यायचं, हे रक्ताचे हवन आहे," असे सांगत त्यांनी संघर्षाचा नवा अध्याय उघडण्याचे संकेत दिले. "आई शप्पथ सांगतो जूनमध्ये जसा पाऊस धो-धो पडतो, तसा प्रहार कार्यकर्ता नागपुरात धो-धो बरसणार", या घोषणेमुळे मेळाव्यातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या मानधनात वाढ या मागण्यांसह अन्य मागण्यांना आग्रही ठेवत हे आंदोलन असणार आहे

राज्यातील योजनांवर टीका करताना बच्चू कडूंनी "सध्या राज्यात कमिशनच्या योजना सुरू आहेत, ज्या योजनांत जास्त कमिशन मिळते त्या लगेच मंजूर होतात," असे सांगत सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com