'राष्ट्रवादीला सोबत घ्यायची गरज नव्हती' शिंदे गटाच्या आमदाराचं धक्कादायक विधान
राज्यात शिवसेना भाजप युतीचे सरकार व्यवस्थित सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घ्यायची गरज नव्हती असं धक्कादायक विधान शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केलंय. राष्ट्रवादीला सोबत घेतल्याने अडचण होत असल्याची कबुली गोगावले यांनी दिलीय.
काय म्हणाले भरत गोगावले?
दोन्हींचे सरकार व्यवस्थित चालले होते पण काही राजकीय गणिते करून त्यांना सोबत घेतलंय. आता सोबत घेतलंय तर बरोबरीने वागवणे गरजेचं आहे. हेवेदावे बाजूला ठेवले पाहिजेत. आम्ही सत्तेतून बाहेर पडलो तेंव्हा तटकरे, अजित पवार आमच्या सोबत नव्हते. पण आता सोबत आलेत तर हातात हात घालून चालतोय. तेंव्हा विजय शिवतारे यांनीही अजित पवार यांच्यासोबत हातात हात घालून चालावं असं गोगावले म्हणाले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अजित पवार गटाने आपला पहिला उमेदवार जाहीर केलाय. रायगडमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुनील तटकरेंना उमेदवारी देण्यात आलीय.