'आमचं सरकार आलं तर 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवू' राहुल गांधींची मोठी घोषणा
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज पुण्यात सभा पार पडली. पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ राहुल गांधींच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या सभेत राहुल गांधींनी मीडियाला धारेवर धरत "देशामध्ये दलित, आदिवासी, ओबीसींचे प्रश्न आहे. ते प्रश्न मीडियावाले दाखवणार नाहीत. शेतकरी, शेतमजुरांचे प्रश्न हे लोक दाखवणार नाहीत. हे फक्त अंबानीचं लग्न दाखवतील असा थेट हल्लाबोल केला आहे. तसचं पंतप्रधान मोदींना आरक्षणावरुन एक प्रश्न उपस्थित केला.
ते म्हणाले की, आजची लढाई ही संविधान वाचवण्यासाठीची लढाई आहे. एकीकडे इंडिया अलायन्स संविधान वाचवण्यासाठी लढत आहे. तर दुसरीकडे भाजप, नरेंद्र मोदी आणि आरएसएस संविधान संपवायला निघाले आहेत. यावेळी राहुल गांधींच्या हातात संविधानाची प्रत होती.
''जे मुलभूत हक्क आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिलेत, जे हक्क महात्मा गांधींनी मिळवून दिलेत ते कधीही संपवू देणार नाही. त्यामुळे आम्ही कधीही संविधान बदलू देणार नाहीत. ''
ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं. आरक्षणाची जी पन्नास टक्क्यांची मर्यादा आहे, त्यावर त्यांची भूमिका काय? त्यांनी त्यांच्या भाषणात याबाबत बोललं पाहिजे. मात्र आम्ही निर्णय घेतला आहे. आम्ही आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा हटवणार आहोत.
"देशामध्ये दलित, आदिवासी, ओबीसींचे प्रश्न आहे. ते प्रश्न मीडियावाले दाखवणार नाहीत. शेतकरी, शेतमजुरांचे प्रश्न हे लोक दाखवणार नाहीत. हे फक्त अंबानीचं लग्न दाखवतील. कुणी किती महागडे कपडे घातले, हे दाखवण्यात मीडियाला रस आहे.
तसच राहुल गांधी यांनी या सभेत मोठी घोषणा केली. लोकसभा निवडणुकीनंतर देशात इंडिया आघाडीचं सरकार आलं तर देशात आरक्षणाची असलेली 50 टक्के मर्यादा हटवू, अशी मोठी घोषणा राहुल गांधी यांनी आज केली. 'कधी त्यांचे नेता संविधान बदलण्याबद्दल बोलतात, तर कधी बोलतात की, आरक्षण संपवून टाकणार. मोदींनी फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्यावं, हे 50 टक्के आरक्षणाची मर्यादा आहे, ही मर्यादा त्यांनी कुठेही सांगावं की, ते 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवून टाकणार. त्यांनी कुठेही जावून सांगावं. आम्ही निर्णय घेतला आहे की, निवडणुकीनंतर आम्ही ही मर्यादा, ज्यामुळे कोट्यवधी नागरिकांचं नुकसान होत आहे, 50 टक्क्यांची मर्यादा आम्ही तोडून टाकू आणि बाहेर फेकून देऊ”, असं राहुल गांधी म्हणाले.