Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिण योजनेबाबत मोठी बातमी, भर सभेत एकनाथ शिंदेंचा शब्द
ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे अडीच लाख रुपयांच्या आत आहे, अशा गरीब कुटुंबांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. ही योजना विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी जाहीर करण्यात आली होती, या योजनेचा मोठा फायदा हा महायुतीला मिळाल्याचं देखील समोर आलं, राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं, तर महाविकास आघाडीला मोठा दणका बसला होता. दरम्यान विधानसभा प्रचाराऐवळी महायुतीमधील अनेक नेत्यांनी या योजनेच्या सन्मान निधीमध्ये वाढ करण्याची देखील घोषणा केली होती, राज्यात सरकार आलं तर 2100 रुपये देऊ असं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र याबाबत अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीये.
दरम्यान ही योजना सुरू करताना काही अटी घालण्यात आल्या होत्या, ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत, अशा महिला देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचं आता समोर येत आहे, त्यामुळे अशा महिलांना या योजनेतून वगळण्याच्या हालचालींना वेग आला असून, अशा अनेक महिलांची नावं या योजनेतून कमी करण्यात आली आहेत, तसेच पात्र असेल तरच महिलांना या योजनेचा लाभ मिळावा, आणि सरकारच्या तिजोरीवरील भार थोडा हलका व्हावा यासाठी आता सरकारकडून या योजनेसाठी केवायसी सक्तीची करण्यात आली आहे. सुरुवातील केवायसीसाठी 18 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती, त्यानंतर आता यामध्ये वाढ करण्यात आली असून, केवायसीसाठी आता 31 डिसेंबरपर्यंत मुदत असणार आहे.
दरम्यान या योजनेतून महिलांची नाव वगळ्यात येत असल्यामुळे आता विरोधकांकडून या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे, विरोधकांकडून सरकारच्या कोंडीचा प्रयत्न होत आहे. ही योजना लवकरच बंद होणार असल्याचा आरोप देखील विरोधकांकडून सुरू आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला आहे, ही योजना खरच बंद होणार का? अशी भीती त्यामुळे निर्माण झाली आहे. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा संभ्रम दूर केला आहे, ही योजना कधीही बंद होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ते पालघर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलत होते. पुन्हा एकदा ही योजना बंद होणार नसल्याचं एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे.

