रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचं मोठं विधान, म्हणाले, "विक्रमी मताधिक्क्याने..."
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या काही मतदारसंघातील जागावाटपाचा तिढा कायम आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. येथील उमेदवारीबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी लवकरच जाहीर करणार आहोत. या मतदारसंघातील उमेदवार विक्रमी मताधिक्क्याने जिंकून येईल. निवडणुकीला ३४ दिवस बाकी राहिले आहेत. बुथवरील कार्यपद्धतीबाबत या बैठककीत चर्चा झाली, असं चव्हाण म्हणाले.
माध्यमांशी संवाद साधताना चव्हाण पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात होत असलेल्या राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या कार्यपद्धतीबाबत बैठकीत चर्चा झाली. महायुतीचा उमेदवार जिंकण्यासाठी जास्तीत जास्त काम करण्याची गरज आहे. यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. ४०० पेक्षा अधिक जागा मिळण्यासाठी कार्यपद्धती कशी असावी, यासाठी राज्यात बैठक होणार आहे.