CM Fadnavis On Kabutarkhana : मुंबईतील कबुतरखाने पुन्हा सुरू होण्याची शक्यता! मुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाची सुचना "कबूतरखाना बंद करणं..."
मुंबईतील कबुतरखान्यांवरून निर्माण झालेल्या वादाला आता शांत होण्याची दिशा मिळाली आहे. मुंबई महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वी कबुतरखाने हटवण्याची कारवाई सुरू केली होती. मात्र या मुद्द्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या विषयाला अनुसूरून एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले की, कबुतरखाने अचानक बंद करणे हे योग्य नाही. त्यांनी यावर उपाय शोधण्यावर भर दिला.
फडणवीस म्हणाले की, कबुतरांमुळे जर आरोग्यविषयक त्रास होत असेल, तर त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास केला पाहिजे. यावर तातडीने बंदी लावणे हा पर्याय नसून तोटादायक ठरू शकतो. मुख्यमंत्र्यांनी सुचवले की, कबुतरांना दाणे टाकण्यासाठी निश्चित वेळ व जागा ठरवता येऊ शकते. तसेच, या ठिकाणी स्वच्छतेसाठी विशेष यंत्रणा वापरण्याचेही निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. या निर्णयामुळे कबुतरांच्या संगोपनासाठी काम करणाऱ्या संस्था आणि कबुतरप्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत आहे. आता प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांनी एकत्रितपणे उपाययोजना राबवून दोन्ही बाजूंचा समतोल राखण्याचा प्रयत्न करणे अपेक्षित आहे.