Mohan Bhagwat : “दहा–बारा वर्षांत जातिभेद संपुष्टात येईल”, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य

Mohan Bhagwat : “दहा–बारा वर्षांत जातिभेद संपुष्टात येईल”, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य

येणाऱ्या दहा ते बारा वर्षांत भारतातून जातिभेद संपुष्टात येऊ शकतो, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केला आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

येणाऱ्या दहा ते बारा वर्षांत भारतातून जातिभेद संपुष्टात येऊ शकतो, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केला आहे. जातिभेद संपवायचा असेल तर समाजाने जात न पाहण्याची सवय मनाला लावणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्व समाजघटकांनी हे प्रामाणिकपणे अंगीकारले, तर जातिभेदाचा प्रश्न कायमचा सुटू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. भागवत म्हणाले की, पूर्वी व्यवसाय व कामाच्या स्वरूपानुसार जाती निर्माण झाल्या होत्या, मात्र कालांतराने त्यातून भेदभाव वाढत गेला. आजचा जातिभेद हा सामाजिक गरजेपेक्षा अधिक अहंकारातून निर्माण झालेला प्रश्न आहे. त्यामुळे केवळ कायदे किंवा घोषणांमुळे नव्हे, तर मनाची भूमिका बदलल्याशिवाय जातिभेद संपणार नाही, असे त्यांनी ठामपणे नमूद केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेबाबत बोलताना सरसंघचालक म्हणाले की, संघाची कोणाशीही स्पर्धा नाही. कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा विचारसरणीविरोधात संघ उभा नाही. सर्व समाजघटकांना सोबत घेऊन देश वैभवसंपन्न करण्याचा संघाचा प्रयत्न आहे. समाजात एकात्मता निर्माण होणे, बंधुता वाढणे आणि परस्पर सन्मानाची भावना निर्माण होणे हे संघाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराबाबतही डॉ. भागवत यांनी महत्त्वपूर्ण मत व्यक्त केले. तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करावा, मात्र त्याचा गुलाम बनू नये, असा सल्ला त्यांनी दिला. तंत्रज्ञान हे मानवी जीवन सुलभ करण्यासाठी आहे, मानवी मूल्ये संपवण्यासाठी नव्हे, असे त्यांनी स्पष्ट केले.

आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत मानवी मूल्ये, परस्पर संवाद आणि सामाजिक जबाबदारी यांना अधिक महत्त्व देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. जात, वर्ग किंवा पंथ यापलीकडे जाऊन माणूस म्हणून एकमेकांकडे पाहण्याची मानसिकता विकसित झाली, तरच खऱ्या अर्थाने सामाजिक परिवर्तन घडू शकते, असेही त्यांनी नमूद केले. डॉ. मोहन भागवत यांच्या या वक्तव्यामुळे जातिभेद, सामाजिक समता आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयांवर पुन्हा एकदा व्यापक चर्चा सुरू झाली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com