India Pakistan War : पाकड्यांनी गुडघे टेकले; अखेर तीन दिवसांनंतर दोन्ही देशांकडून शस्त्रसंधीचा निर्णय
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशवाद्यांची ठिकाणं एअर स्ट्राईकनं उद्ध्वस्त केली. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर विविध ठिकाणी ड्रोनद्वारे हल्ले सुरू केले. त्याला भारताने प्रत्युत्तर देत पाकिस्तानचे हल्ले परतवून लावले. दरम्यान, भारताच्या हल्ल्यांनी जेरीस आलेल्या पाकिस्तानने गुडघे टेकले. त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर भारतानेही शस्त्रसंधीचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, दोन्ही देशांनी शस्त्रसंधी जाहीर केल्यानंतर ७२ तासांनी तणावपूर्ण वातावरण निवळणार असल्याचे सांगितले जात आहे.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, "पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी (डीजीएमओ) आज दुपारी ३.३५ वाजता भारतीय लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांना फोन केला. दोन्ही बाजूंनी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १ वाजल्यापासून जमिनीवर, हवेत आणि समुद्रात सर्व गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. आज, या सामंजस्य कराराची अंमलबजावणी करण्यासाठी दोन्ही बाजूंना सूचना देण्यात आल्या आहेत. लष्करी ऑपरेशन्स महासंचालक १२ मे रोजी दुपारी १२ वाजता पुन्हा चर्चा करतील."
दरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री यांनी काही वेळापूर्वी एक्स पोस्टद्वारे पाकिस्तानकडून शस्त्रसंधीची तयारी दर्शवली होती. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखी दोन्ही देशांना युद्ध संपवण्याच्या सुचना केल्या होत्या.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्स पोस्ट करत म्हटले होते की, "अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रीच्या दीर्घ चर्चेनंतर, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, भारत आणि पाकिस्तान पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमत झाले आहेत."