संत्रावरील आयातशुल्क कमी करण्याकरिता केंद्र सरकारने बांगलादेशसोबत चर्चा करावी; वर्धाचे खासदार रामदास तडस यांची मागणी
भूपेश बारंगे, वर्धा
संत्रावरील आयातशुल्क कमी करण्याकरिता केंद्र सरकारने बांगलादेशसोबत चर्चा करावी, अशी विनंती वर्धेचे खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत केली आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे सर्वात जास्त नुकसान विदर्भातील शेतक-यांचे झालेले आहे, तसेच याचा परिणाम संत्रा उत्पादक शेतक-यांवर झालेला आहे. विदर्भात संत्रा उत्पादक शेतकरी सर्वात जास्त आहे व विदर्भातील संत्रा हा बांगलादेशामध्ये जास्त प्रमाणात निर्यात केला जातो, परंतु बांगलादेशाने संत्रावर आयात शुल्क वाढविल्यामुळे अनेक संत्रा उत्पादक शेतक-यांना नुकसान होत आहे.
विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी व निर्यातदारांनी खासदार रामदास तडस यांना बांगलादेशाने आयातशुल्क कमी करावे यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगाने वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत अंतर्गत संत्रा आयात शुल्काचा मुद्दा उपस्थित करुन लोकसभेचे लक्ष वेधले.