Chandrashekhar Bawankule : 'पुरंदर विमानतळासंदर्भात शेतकऱ्यांनी सात दिवसांत आपल्या मागण्या सरकारपुढे मांडाव्यात'

Chandrashekhar Bawankule : 'पुरंदर विमानतळासंदर्भात शेतकऱ्यांनी सात दिवसांत आपल्या मागण्या सरकारपुढे मांडाव्यात'

पुरंदर येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी होणाऱ्या भूसंपादनाला स्थानिक शेतकऱ्यांचा जोरदार विरोध आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

पुरंदर येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी (Purandar Airport) होणाऱ्या भूसंपादनाला स्थानिक शेतकऱ्यांचा जोरदार विरोध आहे. मात्र, हा प्रकल्प पश्चिम महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, नागपूरच्या मिहान प्रकल्पासारखा बदल घडवणारा ठरेल, असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केले.

या पार्श्वभूमीवर सात गावांतील शेतकऱ्यांशी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात सुमारे दोन तास चर्चा करताना त्यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांनी सात दिवसांत आपल्या मागण्या सरकारपुढे मांडाव्यात. जमिनीचा मोबदला, पुनर्वसन, आणि इतर सुविधा याबाबतच्या अपेक्षा स्पष्टपणे सांगाव्यात. शासन सर्वोत्तम पर्याय देण्यासाठी तयार आहे. कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आंदोलनादरम्यान काही शेतकऱ्यांवर (farmers) दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या चौकशीची घोषणा करताना त्यांनी सांगितले की, निरपराध व्यक्तींवरील गुन्हे मागे घेण्यासाठी विचार केला जाईल. मात्र, अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई होईल. या संबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशीही चर्चा केली जाईल.

चुकीचे दर व्हॉट्सअ‍ॅपवर पसरवून गैरसमज निर्माण केल्याच्या तक्रारींवर त्यांनी सांगितले की, शासनाची भूमिका पारदर्शक असून, दलालांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. सध्या भूसंपादनाचे सर्वेक्षण तात्पुरते थांबवण्यात आले असून, पुढील १५ दिवसांत पुन्हा चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. या बैठकीस आमदार विजय शिवतारे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com