Kabutar Khana : जैन समाजाच्या 'त्या' आंदोलनावर फडणवीसांची प्रतिक्रिया म्हणाले, ".... जनता विश्वास ठेवणार नाही"
Dadar Kabutar Khana : मुंबईतील दादर येथील कबूतरखाना हटवण्याच्या निर्णयावरून जैन समाज आक्रमक झाल्याचे चित्र सोमवारी पाहायला मिळाले. आंदोलकांनी महापालिकेकडून बसवलेली ताडपत्री काढून टाकत ती फाडली, तसेच बांबूही तोडले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. मात्र, काही वेळानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, सरकार धार्मिक भावना आणि सार्वजनिक आरोग्य यांचा समतोल साधण्यासाठी प्रयत्नशील आहे. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
"परंपरा खंडित होणार नाही"
फडणवीस म्हणाले, "दादर कबूतरखान्याच्या प्रकरणात एकीकडे जैन समाजाच्या धार्मिक भावना आहेत, तर दुसरीकडे नागरिकांचे आरोग्यही तितकंच महत्त्वाचं आहे. या दोघांमध्ये योग्य समतोल साधणारा मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. काही पर्यायी उपाययोजना आम्हाला सूचल्या आहेत, ज्या लवकरच कोर्टात मांडण्यात येतील. यामुळे दीर्घकालीन परंपरा खंडित होणार नाही आणि आरोग्याच्या दृष्टीनेही समस्या निर्माण होणार नाहीत," असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आंदोलनानंतर कबूतरखाना पुन्हा सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी महापालिकेने आधी लावलेली ताडपत्री आंदोलकांनी हटवली आणि कबूतरांना खाद्य टाकण्यास सुरुवात झाली
"विरोधक गोंधळलेले, जनता विश्वास ठेवणार नाही"
राजकीय घडामोडींवर भाष्य करताना फडणवीसांनी विरोधी पक्षांवरही निशाणा साधला. "विरोधक सध्या पूर्णपणे गोंधळलेले आहेत. सकाळी काही बोलतात, संध्याकाळी दुसरे, आणि दुसऱ्या दिवशी तिसरे. अशा गोंधळलेल्या नेतृत्वावर जनता विश्वास ठेवणार नाही," असे त्यांनी सांगितले.
दिल्लीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. तर उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, "शिंदेसाहेब पंतप्रधानांना भेटत आहेत आणि उद्धवजी त्यांच्या सहकाऱ्यांना – राहुल गांधींना भेटत आहेत. यात काही विशेष नाही."