Chhatrapati Sambhaji Nagar : अवकाळी पावसाचा तडाखा ; संभाजीनगर, जालना, नाशिकमध्ये शेतीचं मोठं नुकसान

Chhatrapati Sambhaji Nagar : अवकाळी पावसाचा तडाखा ; संभाजीनगर, जालना, नाशिकमध्ये शेतीचं मोठं नुकसान

या हवामान बदलामुळे नागरिकांना उकाड्यातून थोडा दिलासा मिळाला असला तरी, शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
Published by :
Shamal Sawant
Published on

संभाजीनगर, जालना आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये सोमवारी दुपारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने आणि गारपिटीने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. या हवामान बदलामुळे नागरिकांना उकाड्यातून थोडा दिलासा मिळाला असला तरी, शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

लासूर, वाळूजमध्ये गारपीट; जालन्यातही पावसाचा कहर

संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर आणि वाळूज परिसरात गारांसह पावसाची नोंद झाली. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील वाल्हा गावात जोरदार गारपीट झाली. त्यामुळे उन्हाच्या झळांपासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी, शेतकऱ्यांना मात्र नुकसानाला सामोरे जावे लागले आहे.

नाशिकमध्ये आंबा बागांचे आणि कांदा बियाण्यांचे नुकसान

नाशिकच्या मनमाड आणि पानेवाडी परिसरात देखील अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. परिणामी आंबा बागेतील फळ झडली असून, कांदा बियाण्याचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे नुकसानग्रस्त भागांचा तातडीने पंचनामा करण्याची मागणी केली आहे.

हवामान खात्याचा अंदाज – पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम

हवामान विभागाने पुढील तीन दिवस विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, सातारा, रायगडसह अन्य जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन

अवकाळी पावसामुळे गहू, डाळिंब, आंबा यासारख्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने, हवामान विभागाने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे वातावरणात बदल होत असून, पुढील काही दिवस हवामानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com