CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांकडून माढ्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी, मदतीचे दिले आश्वासन
थोडक्यात
मुख्यमंत्र्यांकडून माढ्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी
महिलांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या व्यथा
पूरपरिस्थितीच्या संकटानंतर सरकारने जतनेला दिला दिलासा
महाराष्ट्रात सध्या पावसाने थैमान घातलं असून अनेक ठिकाणी पावसामुळे दाणादाण उडाली आहे. मराठावड्यासह अनेक भागात पावसामुळे दारूण परिस्थिती निर्माण झाली असून गावं, घरं, शेती सगळं पाण्याखाली गेलं आहे. अतिवृष्टीमुळे लोकांना रहायला जागा नाही, घालायला कोरडे कपडे नाहीत आणि पोटात अन्नाचा कणही नसून मोठं नुकसान झालं आहे. पूरपरिस्थितीमुळे उद्भवलेल्या संकटानंतर सरकारने जतनेला दिलासा देत मदतीचे आश्वासन दिले आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) , उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नुकसानग्रस्त भागात दौरे सुरू आहेत. सोलापूर आणि लातूर या दोन जिल्ह्यांचा पाहणी दौरा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांचा माढ्यातील निमगामवमध्ये पाहणी दौरा सुरू आहे. निमगाव आणि आसपासच्या गावात पावसाने मोठं नुकसानं केलं. शेती अक्षरश: पाण्याखाली गेल्याने हाहा:कार माजला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज तिथे जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. फडणवीसांकडून प्रथम माढ्यातील निमगावमध्ये पाहणी करण्यात आली, तेथील लोकांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी आमदार अभिजीत पाटील, जयकुमार गोरे हेही मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित होते.
तेथील अधिकारी तसेच स्थानिक नागरिकांशी बोलून मुख्यमंत्र्यांवी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, त्यांच्या व्यथा समजून घेत मागण्याही ऐकून घेतल्या. एका शेतकऱ्याने त्यांची भेट घेऊन संपूर्ण परिस्थिती समजावून सांगितली. निमगाव यासह उंदरगाव असेल, वाकाव, दारफळ यासह सीना नदीच्या पट्ट्यात येणाऱ्या गावांमध्ये भीषण परिस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल सविस्तर जाणून घेतलं, ड्रोन दृश्य त्यांनी पाहिली, संपूर्ण परिस्थितीचा, नुकसानाचा आढावाही घेतला. पुरामुळे कसं थैमान माजलं आहे, नेमकं किती नुकसान झालं याची आकडेवारीही त्यांनी जाणून घेतली. काही ठिकाणी माती, शेती वाहून गेली , हजारो एकर शेतीपिकांचं नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झालेला दिसला. मात्र राज्यसरकारकडून मदतीचे आश्वासन देण्यात येत आहे.
निमगावातील दौऱ्यादरम्यान स्थानिक महिलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तिथल्या परिस्थितीची त्यांनी सविस्तर माहिती दिली. कुठे-कुठे किती पाऊस पडला, पाणी साचलं याबद्दल सांगितलं, तसंच गावातील परिस्थिती, अतिवृष्टीमुळे उडालेली दैना, पिकाचं झालेलं नुकसान, या सगळ्यांचा पाढा महिलांनी मुख्यमंत्र्यांसमोर वाचला. सर्वांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतल्यानंतर योग्य मदत करू अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी नमिगावकरांना दिली आहे. पुढे ते दारफळ गावात जाऊन तेथीलही पाहणी करणार आहेत.
दिवाळीपूर्वीच सरकार सर्वांना मदत करणार
निमगावनंतर मुख्यमंत्र्यांनी दरफळ गावात जाऊन तेथील नुकसानाची, परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांना तर सरकार मदत करणार आहेत. पण पण ज्यांच्या घराचं , अन्नधान्याचं नुकसान झालं आहे, अशा लोकांना देखील आम्ही मदत करणार आहोत. शासनाने हा निर्णय घेतला आहे की, कोणतेही अधिकचे निकष न लावता आणि आवश्यकता असेल तर निकष शिथिल करून नागरिक-केंद्रीत मदत करणार आहोत. केवळ नियमांवर बोट न ठेवता, नागरिकांना व शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशा पद्धतीने मदत करण्याचे निर्देश दिले आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दिवाळीपूर्वीच सरकार सर्वांना मदत करणार असंही त्यांनी नमूद केलं.